केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याही अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. इंदिरा गांधी यांच्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. 2020-2021 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प त्या आज सादर करतील. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाचं वाचन सुरु होईल.

दरम्यान आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 6 ते 6.5 टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

2016 पर्यंत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी बजेट सादर करण्याची प्रथा होती. मात्र माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017 पासून 1 फेब्रुवारीला बजेट सुरु करण्यास सुरुवात केली. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्येही हीच प्रथा सुरु आहे. काय स्वस्त होणार? काय महाग होणार? रेल्वेला काय मिळणार? शेतकऱ्यांना काय मिळणार? टॅक्स स्लॅब बदलणार की जैसे थेच राहणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून रोजगार, देशाची ढासळती अर्थव्यवस्था, मंदी या सगळ्या मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरत आहेत. मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. आता आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात या सगळ्याबाबत काही तरतुदी असणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.