NIT Topper Laid Off From Bengaluru Tech Firm: सोशल मीडिया युजर व्यंकटेश अल्ला यांच्या एका व्हायरल एक्स पोस्टमुळे भारतातील नोकरीच्या सुरक्षिततेबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) मधील टॉपर असलेले इंजिनिअर सलीम यांची व्यथा मांडली आहे.
सलीम यांना बेंगळुरूच्या एका आघाडीच्या टेक कंपनीतून कामावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांना ४३.५ लाख रुपये वार्षिक पगार होता. उल्लेखनीय म्हणजे, सलीम यांनी पाच वर्षांत ३० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कर भरला होता, ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या ११.२२ लाख रुपयांचा समावेश आहे. परंतु नोकरी गमावल्यानंतर त्यांना कोणताही आधार मिळाला नाही. कंपनीने त्यांना फक्त तीन महिन्यांचा पगार भरपाई म्हणून दिला आहे.
आता बेरोजगार असलेले सलीम त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना मिळालेल्या तीन महिन्यांच्या पगारावर आणि बचतीवर अवलंबून आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च प्रति वर्ष प्रति मूल १.९५ लाख रुपये आहे.
“आता बेरोजगार असलेले, सुदैवाने गृहकर्ज नसल्यामुळे, सलीम त्यांच्या बचत आणि भरपाई म्हणून मिळालेल्या तीन महिन्यांच्या पगारातून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करत आहेत. त्यांच्या प्रत्येक मुलाचा शिक्षणासाठी दरवर्षी १.९५ लाख रुपये खर्च आहे. त्याहूनही वाईट म्हणजे, ते नैराश्यात गेले आहेत. ते म्हणत आहेत की, त्यांना अचानक रस्त्यावर आल्यासारखे वाटते, सर्वांनी एकटे सोडून दिले आहे. ज्या सरकारला त्यांनी लाखो रुपयांचा कर दिला, त्याच सरकारने त्यांना सर्वात जास्त गरज असतानाच त्यांचा विश्वासघात केला,” असे व्यंकटेश अल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
व्यंकटेश अल्ला आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणाले की, “भारतात खऱ्या करदात्यांच्या बाबतीत असेच घडते. तुम्ही कर भरता. तुम्ही नियम पाळता. तुम्ही योगदान देता आणि जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा तुम्हाला स्वतःला या गोष्टींना समोर जावे लागते. या देशाला बदलण्याची नितांत गरज आहे. कारण सध्या देश पुढे नेणाऱ्या लोकांनाच अपयश येत आहे.”
या पोस्टमुळे भारतातील पगारदार करदात्यांना, विशेषतः संकटकाळात, पाठिंबा मिळत नसल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक युजर्सनी महत्त्वाच्या सुधारणांसाठी मागणी केली आहे. ज्यात नोकरी गेल्यास आर्थिक मदत देण्यासाठी बेरोजगार भत्ते, संबंधित भावनिक संघर्षांना तोंड देण्यासाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम, आणि पगारदार करदात्यांना ठोस परतावा देणाऱ्या कर सुधारणांचा समावेश आहे, ज्यामुळे संकटकाळात कर भरणाऱ्यांना सुरक्षितता मिळू शकेल.