बिहारमधील किशनगंज येथे काल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) विरोधात रॅली घेतली.यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. तसेच, ओवैसी यांनी यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एक विशेष ऑफरही दिली. तुम्ही पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या साथ सोडा, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ असे, ओवैसी यांनी यावेळी जाहीरपणे नितीश कुमार यांना आवाहन केले.

यावेळी ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदी अमित शाह हे सामान्य राजकारणी  नाहीत, तुम्ही यांच्यापासून स्वत:ला वेगेळे करा, आम्ही तुम्हाला समर्थन देऊ. तुम्ही बिहारमध्ये तुमचे नाव बनवले आहे, तुम्ही देशाच्या हितासाठी भाजपाला सोडले पाहिजे. तसेच, बिहारमध्ये एनपीआर लागू करणे सोपे राहणार नाही, हे लागू करण्याअगोदर नितीश कुमार यांना याची सार्वजनिक घोषणा करावी लागेल.

तसेच, सध्या त्यागाची वेळ आहे व आपल्याला देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी खूप काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. हा मुद्दा केवळ मुस्लीमांचाच नाहीतर राज्यघटनेच्या संरक्षणाचा आहे. पंतप्रधान मोदींना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही जिन्ना यांच्याशी हात मिळवला नाही. आम्ही देशाबरोबर आहोत, आम्हाला कोणाचीही भीती वाटत नसल्याचे देखील ओवैसी यांनी यावेळी म्हटले.

या अगोदर ओवैसींनी हैदराबादेतील सभेद्वारे देशवासीयांना उद्देशुन, सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात असल्याचा भाजपाला संदेश देण्यासाठी, सर्वांनी आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनी आपल्या घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) चा विरोध दर्शवावा. लोकांवर गोळीबार केला जात आहे व हे चुकीचे असे मोदी म्हणाले होते.