महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून येथे नितीशकुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी भाजपासोबत असलेली युती तोडून राष्ट्रीय जनता दल (राजद) तसेच इतर मित्रपक्षांना सोबत घेऊन महागठबंधनची स्थापना केली आहे. नितीशकुमार यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राजद हा पक्षासोबत महागठबंधन करून बिहारमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन केले आहे. त्यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी भाजपाशी असलेली युती तोडून महागठबंधन केले. यामध्ये एकूण सात पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार असून या आमदारांच्या पाठींब्याचे पत्र त्यांनी काल (९ ऑगस्ट) राज्यपालांकडे सोपवले होते. त्यानंतर आज राज्यपालांनी त्यांना शपथविधीसाठी आमंत्रित केले होते.

महागठबंधनचे सरकार स्थापन करण्याआधी नितीशकुमार यांनी भाजपासोबतची युती तोडली. दोन वर्षांपूर्वीच भाजपा आणि नितीशकुमार (जेडीयू पक्ष) यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एसजेडी आणि भाजपा यांच्यात वाद सुरू होता. हा वाद काही दिवसांपासून शिगेला पोहचला होता. अखेर नितीशकुमारांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत राजद पक्षाला सोबत घेऊन महागठबंधन करण्याचा निर्णय घेतला.