निधर्मी म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे कौतुक करणाऱया पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नितीशकुमार यांनी मंगळवारी आभार मानले. मनमोहनसिंग यांनी केलेल्या कौतुकामुळे आपल्याला समाधान वाटल्याचे नितीशकुमार यांनी सांगितले.
राजकारणात कोणीही कुणाचे कायमस्वरुपी शत्रू नसते आणि कायमस्वरुपी मित्रही नसते, अशा सूचक शब्दांत नितीशकुमार यांनी संयुक्त जनता दल आणि कॉंग्रेसमधील बदलत्या संबंधांवर भाष्य केले. पुढील परिस्थिती पाहून आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मनमोहनसिंग यांनी सत्य सांगितले आहे. कोणत्याही व्यक्तीने सत्य परिस्थितीचेच कथन केले पाहिजे. पंतप्रधानांनी माझ्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मला समाधान वाटले असून, मी त्यांचा मनापासून आभारी आहे.