द्रविड मुन्नेत्र कळघमने केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा का काढला, हे आम्हाला सांगता येणार नाही. मात्र, त्यांनी पाठिंबा काढला तरी यूपीए सरकार स्थिर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री कमलनाथ, मनिष तिवारी आणि चिदंबरम यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन द्रमुकच्या पाठिंब्यानंतर केंद्र सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.
चिदंबरम यांनी सोमवारीच द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी द्रमुकने सरकारचा पाठिंबा काढला. एका रात्रीत सरकारचा पाठिंबा काढण्यासारखे काय घडले, याची कल्पना नसल्याचे चिदंबरम यांनी यावेळी सांगितले. श्रीलंकेतील तामिळ नागरिकांना न्याय मिळण्यासाठी केंद्र सरकारने कायमच कठोर भूमिका घेतलीये. तेथील तामिळ नागरिकांना आम्ही कायमच पाठिंबा दिला असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेमध्ये तामिळ नागरिकांवर होणाऱया अत्याचाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी श्रीलंकेविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव मंजूर केला पाहिजे, यासाठी केंद्र सरकार पहिल्यापासून आग्रही आहे. द्रमुकने सरकारला पाठिंबा दिला किंवा काढून घेतला तरी याप्रश्नावर सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.