काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू धर्म आणि हिंदुत्व यांच्यातील फरक सांगितला होता. त्यावर बोलताना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी बुधवारी सांगितले की, “काँग्रेसने धर्माऐवजी पक्षाची मुख्य विचारधारा आणि मूल्ये मजबूत कशी करावी आणि ती समकालीन कशी करावी, यावर चर्चा करायला हवी.” मनिष तिवारी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहेत. त्यात ते म्हणतात, “काँग्रेस पक्षात हिंदू धर्म आणि हिंदूत्वावर सुरू असलेल्या चर्चेनं मी गोंधळलो आहे. जेव्हा काँग्रेसने नेहरूंच्या धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्व धर्म समभाव काढला तेव्हापासून पक्षाची घसरगुंडी सुरू आहे. खरंतर यावर व्यापक चर्चा व्हायला हवी. हिंदू धर्म आणि हिंदूत्व यातील फरक हा विद्यापीठीय अभ्यास आणि संशोधनासाठीच्या वादविवादाचा विषय आहे. तुम्ही जेव्हा हा फरक राजकारणासाठी करता तेव्हा तुम्ही इतरांच्या अजेंड्यानुसार चालत असता.” द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तिवारी म्हणाले की, “हिंदू धर्म विरुद्ध हिंदुत्व हा एक शैक्षणिक वाद होता आणि जेव्हा तुम्ही शैक्षणिक उद्देशाव्यतिरिक्त इतर राजकीय हेतूंसाठी हा फरक करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मैदानावर खेळता. जर वादविवाद व्हायलाच हवेत, असं तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही काँग्रेस पक्षाची मूळ विचारधारा आणि मूलभूत मूल्ये कशी मजबूत कराल यावर असली पाहिजे. काँग्रेसने जर आपली संस्थापक मूल्ये सोडली, तर लोक कधीही तुमच्या दुसऱ्या मूल्यांना प्राध्यान्य देत नाहीत,” असंही त्यांनी म्हटलं. “रक्तरंजित फाळणीनंतरही काँग्रेस त्या महासंकटाच्या आणि शोकांतिकेच्या काळातही, धर्मनिरपेक्षतेवरच्या विश्वासावर ठाम होती. आणि म्हणूनच काँग्रेसचा मूलभूत गाभा उदारमतवाद, बहुलवाद आणि पुरोगामीवाद या मूल्यांशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही. त्यामुळे, इतर कोणत्याही बहुसंख्य किंवा अल्पसंख्याक विचारसरणीवरील वादविवाद हे काँग्रेसच्या आचारसंहितेसाठी परके आहेत,” असं तिवारी म्हणाले.