गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते ओ राजगोपाल यांना अखेर यश मिळाले. राजगोपाल यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असून, त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे व्ही. सिवनकुट्टी यांचा नऊ हजार मतांनी पराभव केला. यामुळे केरळ विधानसभेत प्रवेश करणे भाजपला शक्य झाले.
राजगोपाल यांच्या विजयाबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आनंद व्यक्त केला. केरळमध्ये भाजपचे काम करणाऱ्या सर्वांना मी सलाम करतो. अनेक दशकांपासून एकेक वीट रचल्यामुळेच आज हे दिवस पाहायला मिळताहेत, अशा आशयाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले. पुढील काळात केरळमधील आमचा आवाज आणखी बुलंद होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.