Pahalgam Visit Of Omar Abdullah: जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २२ एप्रिल रोजी हल्ला केला होता. यामध्ये तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचबरोबर अनेकांनी जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी जाण्याचे बेत रद्द केले होते.

या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी पहलगाम येथे एक विशेष मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीच्या माध्यमातून “भ्याड दहशतवादी कृत्यांमुळे जम्मू आणि काश्मीर खोऱ्यातील पर्यटन थांबणार नाही” असा संदेश देण्यात आला.

जम्मू आणि काश्मीर सरकारचे हे प्रतीकात्मक पाऊल काश्मीरमधील सर्वात निसर्गरम्य पण संवेदनशील पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक भयानक दहशतवादी हल्ला झाला ज्यामध्ये २६ नागरिकांचा मृत्यू झाला आणि यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल नवीन भीती निर्माण झाली होती.

दरम्यान ओमर अब्दुल्ला यांनी त्यांनी पहलगामला दिलेल्या भेटीचे काही फोटोही एक्सवर शेअर केले आहेत. याचबरोबर त्यांनी लिहिले की, “पहलगाममध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी आलो आहे. आम्ही स्थानिक लोकांसोबत असल्याचे दाखवण्यासाठी व हळूहळू काश्मीर आणि पहलगामला परतणाऱ्या सर्व पर्यटकांचे आभार मानण्यासाठी देखील आलो आहोत.”

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही येथे फक्त सरकारी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आलो नाही. आम्ही येथे एक संदेश देण्यासाठी आलो आहोत की, दहशतवाद आणि रक्तपात जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटन, आनंद आणि विकास थांबवू शकणार नाही”.

एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील लोकांनी, विशेषतः पहलगामच्या नागरिकांनी दाखवलेल्या धाडसाचेही अब्दुल्ला यांनी कौतुक केले. ते म्हणाले “मंत्रिमंडळाची ही बैठक दहशतवादाविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल आणि भीतीला बळी न पडल्याबद्दल पहलगामच्या नागरिकांचे आभार मानन्यासाठीही आयोजित करण्यात आली होती,” असे अब्दुल्ला पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारच्या कार्यकाळात श्रीनगर आणि जम्मू या ठिकाणांच्या बाहेर मंत्रिमंडळाची बैठक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांच्या घटत्या संख्येमुळे चितेत असलेल्या पहलगामला पाठिंबा देण्यासाठी मंत्रिमंडळाची ही बैठक आयोजित करण्यात आली होती.