Indian Air Force X Post on Operation Sindoor : भारत-पाकिस्तान शस्त्रविरामादरम्यान भारतीय हवाई दलाने मोठं विधान केलं आहे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलाने म्हटलं आहे. त्यांनी एक्सवरून यासंदर्भात पोस्ट केली आहे.
भारतीय हवाई दलाने म्हटलंय की, “भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडले.”
“ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने याबाबत योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल. तसंच, खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहा”, असंही आवाहन भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलं आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यान शस्त्रविराम
तीन दिवसांच्या तीव्र संघर्षानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीवर शनिवारी सहमती झाली. पाकिस्तानने प्रस्ताव ठेवल्यानंतर संध्याकाळी ५ वाजल्यापासून शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. मात्र त्याच वेळी यापुढे भारताविरोधात कुरापती न करण्याची सज्जड ताकीदही पाकिस्तानला देण्यात आली आहे. शस्त्रसंधी करताना भारताने कोणत्याही अटी-शर्ती मान्य केलेल्या नाहीत. सीमेवर भारताचे सैन्य दक्ष असून कोणत्याही कुरापतींना सामोरे जाण्यास तयार असल्याचीही ठोस भूमिका भारताने घेतली आहे. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने मध्यस्थाची प्रमुख भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले असले, तरी द्विपक्षीय चर्चेतूनच तोडगा निघाल्याची भूमिका भारताने घेतली आहे.
भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा परराष्ट्र सचिव विक्रम मिस्राी यांनी शनिवारी काही मिनिटांच्या पत्रकार परिषदेत केली. पाकिस्तानच्या लष्कराच्या संचालनाचे महानिर्देशक (डीजीएमओ) मेजर जनरल काशिफ अब्दुल्ला यांनी दुपारी साडेतीन वाजता भारताचे ‘डीजीएमओ’ लेफ्ट. जनरल राजीव घई यांना फोन करून शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवल्याचे मिस्राी म्हणाले. या चर्चेनंतर भू-हवाई-जल अशी तीनही आघाड्यांवर शस्त्रसंधी लागू करण्याचे मान्य करण्यात आले. दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये सोमवारी दुपारी १२ वाजता पुढील चर्चा केली जाईल, असेही मिस्राी यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या घोषणेनंतर संरक्षण दलाच्या वतीनेही पत्रकार परिषद घेऊन, पाकिस्तानच्या कोणत्याही स्वरुपाच्या लष्करी आव्हानाला भारताची संरक्षण दले प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, असे कमोडोर रघु नायर यांनी स्पष्ट केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ‘एक्स’वरून शस्त्रसंधीची माहिती दिली.