नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधातील कारवाईनंतर तृणमूल काँग्रेस, भारत राष्ट्र समिती आणि आपसह इतर विरोधी पक्षांनी भाजपवर तोफ डागली. राहुल गांधींची बडतर्फी तसेच, अदानी समूहाच्या गैरव्यवहारांसाठी ‘जेपीसी’ या दोन मुद्दय़ांवर काँग्रेससह १२ विरोधी पक्षांच्या खासदारांनी शुक्रवारी विजय चौकात मोर्चा काढला. त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेस, माकपच्या खासदार व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संसदभवनामध्ये शुक्रवारी सकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. खरगेंच्या निवासस्थानी गुरुवारी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मोर्चाचा निर्णय आधीच झाला होता. दुपारी साडेबारानंतर दोन्ही सभागृहांतील काँग्रेसचे खासदार तसेच, अन्य विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदभवनातून विजय चौकात मोर्चा काढला. गेल्या आठवडय़ातही विरोधकांनी ‘ईडी’च्या मुख्यालयावर काढलेला मोर्चा विजय चौकात पोलिसांनी अडवला होता. यावेळी देखील पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. जमाव बंदी लागू करण्यात आल्याने घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या खासदार व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सत्ताधारी पक्षाचे सुडाचे राजकारण! राहुल गांधींच्या कारवाईनंतर विरोधी पक्षांची जोरदार टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ‘‘सत्ताधारी पक्ष सुडाच्या राजकारणात गुंतला असून लोकशाहीसाठी हे धोकादायक आहे,’’ अशा शब्दांत विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल चढविला.

काँग्रेसशी काही मुद्दय़ांवर वाद असताना तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे. ‘‘पंतप्रधान मोदींच्या नव्या भारतात विरोधी पक्षांचे नेते हे भाजपचे मुख्य लक्ष्य बनले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजप नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाते, तर विरोधी नेत्यांना त्यांच्या भाषणासाठी अपात्र ठरविले जाते,’’ अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. आज आम्ही घटनात्मक लोकशाहीसाठी एक नवीन नीचांक पाहिला आहे, अशी टीका करत बॅनर्जी यांनी राहुल यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राहुल यांच्या अपात्रतेचे वर्णन धक्कादायक असे केले. राहुल गांधींची लोकसभेतून हकालपट्टी धक्कादायक आहे. देश अत्यंत कठीण काळातून जात आहे. त्यांनी संपूर्ण देशाला घाबरवले आहे. त्यांच्या अहंकारी सत्तेविरोधात १३० कोटी जनतेने एकजूट व्हावे लागेल,’’ असे केजरीवाल यांनी सांगितले.

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘‘भाजप आता राहुल गांधींप्रमाणेच विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना अपात्र ठरविण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा आणि बदनामीचा मार्ग वापरत आहे. हे निंदनीय आहे. ईडी-सीबीआयचा विरोधी पक्षांविरोधात होत असलेल्या घोर गैरवापराचा हा सर्वात वरचा भाग आहे. या हुकूमशाही हल्ल्यांचा प्रतिकार करा आणि त्यांना पराभूत करा,’’ असे ट्वीट या ज्येष्ठ डाव्या नेत्याने केले.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ‘‘राहुल गांधी यांची अपात्रता ही सुडाची लढाई आहे. आजच्या ‘अमृतकाल’मध्ये विरोधी नेते आणीबाणीच्या परिस्थितीत जगत आहेत. भाजपकडून सत्तेच्या प्रत्येक साधनाचा वापर करून विरोधकांना जबरदस्तीने गप्प केले जात आहे,’’ असे सोरेन म्हणाले.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील लोकशाहीच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘‘राहुल गांधींविरोधात सुडाची आणि लज्जास्पद कारवाई. ही अपात्रता पुन्हा सिद्ध करते की आपण पिंजऱ्यातील लोकशाहीच्या काळात जगत आहोत,’’ अशा शब्दांत चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ट्वीट करत भाजपवर टीका केली. ‘‘राहुल गांधींवरील कारवाई संतापजनक आहे. प्रथम पी. पी. मोहम्मद फैजल यांच्यावर कारवाई केली, आता राहुल गांधी यांच्यावर कारवाई केली जात आहे, असे सुळे म्हणाल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition united rallies for disqualified congress mp rahul gandhi zws
First published on: 25-03-2023 at 04:27 IST