पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर काल (सोमवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी चर्चाही केली होती. त्यामुळे आज ते काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान देशातील लॉकडाऊन वाढवला जाण्याचेही संकेत मिळाले होते.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. लॉकडाउनमध्ये राज्यांनी अधिकारांच्या विकेंद्रीकरणाची मागणी पंतप्रधानांकडे केली होती. तामिळनाडू, तेलंगण, छत्तीसगड, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रवासी रेल्वे सुरू करण्यास विरोध करत लॉकडाउनला मुदतवाढ देण्याची सूचना केली. तर लॉकडाउन उठवण्याबाबत ठोस धोरण आणि दिशा हवी, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. पंजाबने लॉकडाउन कायम ठेवण्याचा पण, आर्थिक व्यवहारांना हळूहळू वेग देण्याची भूमिका घेतली. लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली होती. तसंच लॉकडाउनचा चौथा टप्पा लागू झाल्यास त्यात आणखी काही सुट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीदरम्यान याबाबत संकेत दिले होते.
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020
दरम्यान, आपापल्या राज्यांमध्ये लॉकडाउन कसा हाताळणार याची व्यापक रणनीती तयार करा आणि त्याची माहिती १५ मे पर्यंत द्या अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना बैठकीदरम्यान केली होती. सध्या देशात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशात लॉकडाउन असला तरी करोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.