Pahalgam Terror Attack दहशवादी हल्ल्याने काश्मीर हादरलं आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन पर्वतावर फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या घटनेत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला
हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे वाचला पाच जणांचा जीव
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, यात हॉटेल मालकाच्या सावधगिरीमुळे महाराष्ट्रातील बुलढाण्यातील पाच पर्यटकांचा जीव वाचला आहे. मंगळवारी काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. हॉटेल मालकाच्या प्रसंगावधनामुळे महाराष्ट्रातील पाच लोकांचा जीव वाचला आहे. यात सध्या बुलढाणा जिल्ह्यातील पाच जण पहलगाम मध्ये अडकले आहेत. मंगळवारी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. तेव्हा पाच जण तेथील हॉटेल मधेच होते. बुलढाण्यातले हे पाचजण हॉटेलबाहेर पडणार होते तेव्हाच हॉटेल मालकाने त्यांना थांबवले.त्यांना सांगितले की, गोळीबार सुरु झाला आहे.बाहेर फिरायला पडू नका.
बुलढाण्यातलं जैन कुटुंब १८ एप्रिल रोजी फिरायला गेलं होतं
बुलढाण्यातील पाच जण १८ तारखेला फिरायला जम्मू काश्मीर मध्ये गेले होते.यामध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. अरुण जैन यांचे भाऊ व त्यांची पत्नी व तीन मुले असा समावेश आहेत. जेव्हा गोळीबार सुरु झाला तेव्हा बुलढाण्यातील कुटुंब तिथेच हॉटेलमध्ये होते. गोळीबाराच्या आवाजाने हे कुटुंब खूप घाबरलं होतं. सध्या हे जैन कुटुंब हॉटेलमध्येच आश्रयला आहे. एकूण पाच लोक आहेत. यामध्ये २ महिला , ३ पुरुषांचा समावेश आहे.काश्मीरमध्ये अडकलेल्या या पाच जणांची नावे निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन अशी आहेत. हे सगळेजण १८ एप्रिलला मुंबईहून काश्मीरला निघाले होते. जम्मू काश्मीर मधील सर्व ठिकाणी फिरुन झाल्यानंतर २१ तारखेला रात्री पहलगामच्या हॉटेलमध्ये आले. २२ तारखेला सकाळी पहलगामध्ये फिरायला निघणार तेवढ्यात हॉटेलच्या लोकांनी गोळीबार झाल्याचे व बाहेर न पडण्यास सांगितले. आता हे कुटुंब सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
निलेश जैन यांनी काय म्हटलं आहे?
मंगळवारी दुपारी आम्ही पहलगाममध्ये फिरायला निघणार होतो. पण आम्हाला हॉटेल मालकाने आणि कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही इथून बाहेर पडू नका. गोळीबार सुरु झाला आहे. त्यामुळे काश्मीर फिरण्याचा आमचा उत्साह मावळला आहे. आमची शासनाला विनंती आहे की आमची इथून बाहेर पडण्याची व्यवस्था करावी. आम्ही स्थानिक वाहनाने श्रीनगरला पोहचत आहोत, असं निलेश जैन यांनी म्हटलं आहे.