पीटीआय, जयपूर : ‘‘पाकव्याप्त काश्मीर (पीओके) स्वत:हून भारतात येईल. थोडी प्रतीक्षा करा,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह सोमवारी व्यक्त केला. भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान दौसा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सिंह बोलत होते.

 ‘जी-२०’ शिखर परिषदेविषयी बोलताना सिंह म्हणाले, की या शिखर परिषदेच्या दिमाखदार आयोजनाने भारताने जागतिक स्तरावर एक वेगळा ठसा उमटवला. अवघ्या जगात आपली क्षमता सिद्ध केली. ही शिखर परिषद सर्वार्थाने अभूतपूर्व झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘जी-२०’ राष्ट्रगटात जगातील सर्व शक्तिशाली देशांचा समावेश असून, या सर्वच देशांनी भारताची  मुक्त कंठाने प्रशंसा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह म्हणाले, की या परिषदेत ‘जैवइंधन आघाडी’बाबत मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेले यश भारताला आर्थिक सबळ बनवणार आहे. राजस्थान सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, सध्याच्या काँग्रेस सरकारच्या काळात राजस्थानात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. युवक आणि शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण केली गेली नाहीत.