पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात संसदीय समितीच्या मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सरकारला याविषयी पुरेसे गांभीर्य असते आणि गुप्तचर यंत्रणांनी व्यवस्थितपणे काम केले असते तर चित्र निश्चितच वेगळे असते, असे या अहवालात म्हटले आहे. पठाणकोट हल्ल्याच्यावेळी दहशतवादाचा प्रतिकार करणाऱ्या संस्थाच्या पातळीवर गंभीर त्रुटी राहिल्या होत्या. याशिवाय, हल्ल्याच्यावेळी पठाणकोट हवाई तळ पूर्णपणे सुरक्षित नव्हता आणि हवाई तळावरील संरक्षक भिंतीचे संरक्षणही तकलादू होते, असे या अहवालात म्हटले आहे. या हल्ल्याची पूर्वसूचना मिळूनही दहशतवादी याठिकाणापर्यंत पोहचून हल्ला कसा करू शकले, याबाबतही अहवालात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. २ जानेवारी रोजी करण्यात आलेल्या या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते.