देशाचे लक्ष लागून असलेल्या उपराजधानीतील लढतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पारडे जड आहे. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भाजपसमोर आव्हान उभे करण्याचा चांगला प्रयत्न केला असला, तरी संघटनात्मक शक्तीत भाजप काँग्रेसपेक्षा पुढे आहे.
पाच वर्षांपूर्वी येथून विजयी होणाऱ्या गडकरींची पाटी तेव्हा कोरी होती. पंधरा वर्षांपूर्वी मंत्री म्हणून केलेली कामे हीच त्यांची एकमेव शिल्लक होती. यावेळी मात्र चित्र वेगळे आहे. गेल्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलण्यात गडकरींना बऱ्यापैकी यश आले आहे. मेट्रोने गरिबांचे काय भले होणार, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात असला व त्यात वरकरणी तथ्य वाटत असले तरी भविष्याचा विचार करून शहर विकासासाठी मेट्रो महत्त्वाची ठरते हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे विकासकामांच्या मुद्दय़ावर काँग्रेसला भाजपचा प्रचार खोडून काढता येत नाही, असे प्रचारादरम्यानचे चित्र आहे. सहा आमदार, पालिकेचे १०८ नगरसेवक, संघ परिवाराशी संबंधित संस्था व पक्षबांधणीतून तयार झालेली कार्यकर्त्यांची फौज भाजपला प्रचारात पुढे नेणारी ठरली आहे. भाजपने गरीब वस्त्यांमध्ये पक्षबांधणी केली. सतत संपर्क ठेवला. गेल्यावेळी थोडीफार मदत करणारा दलित, मुस्लीम व हलबा समाज यावेळी भाजपवर नाराज आहे. पटोलेंमुळे कुणबी समाज कितपत विभाजित होतो हे अद्याप स्पष्ट नाही. अशा जातीय समीकरणाचा गवगवा झाला की इतर वर्ग व समाज एकवटतात. येथे तसे झाले तर मोठय़ा संख्येत असलेला हिंदी भाषिक वर्ग, तेली व इतर लहानमोठे समाज भाजपकडे वळू शकतात.
गडकरींचे प्रतिस्पर्धी म्हणून वातावरण निर्मिती करण्यात बऱ्यापैकी यश मिळवणारे नाना पटोले शहरी मतदारांसाठी तरी नवखे आहेत. मुळात नानांचे राजकारण ग्रामीण मुद्दय़ांभोवती फिरणारे. त्यांच्यामुळे काँग्रेसमधील गटबाजीला विराम मिळाला असला, तरी शहरात या पक्षाची बांधणीच कमकुवत आहे. पक्षाचे सारे नेते प्रचारात सक्रिय असले तरी अनेक ठिकाणी बांधणीच नसल्याने नानांचा प्रचार पोहचू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. दलित, मुस्लीम व कुणबी या जातीय समीकरणाचा फायदा पटोलेंना मिळेल, पण तो विजयापर्यंत नेणारा नसेल हे स्पष्ट आहे. लोकसभेच्या निवडणुकीत जात हा एक घटक असू शकतो, पण मुख्य घटक नसतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे नानांची कोरी पाटीही जशी त्यांच्या जमेची बाजू ठरते, तशीच ती अडचणींचीसुद्धा आहे. येथे राहुल गांधींची सभा झाली. त्याला चांगली गर्दी झाली. मात्र त्यात झालेली भाषणे शेतकरी प्रश्नांशी निगडित होती. नाना व त्यांच्या प्रचारात बोलणारेसुद्धा ग्रामीण प्रश्नांना प्राधान्य देतात. पूर्णपणे शहरी असलेल्या या मतदारसंघात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याकडे दुर्लक्ष करून निवडणूक कशी जिंकता येईल, या प्रश्नाकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेसचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते गटबाजी विसरून नानांच्या प्रचारात जोमाने भिडल्याचे चित्र आशादायी असले, तरी नेते मात्र केवळ प्रचारसभांपुरतेच दिसतात. गेल्यावेळी गडकरी अडीच लाख मतांच्या फरकांनी विजयी झाले होते.