पंतप्रधान मोदींनी विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी केली, तसेच काही रस्ते आणि महामार्गाचं लोकार्पण केलं. पंढरपूर पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की “मी विठ्ठलाला आणि वारकऱ्यांना नमन करतो. देशावर कितीही संकटं आली तरी भगवान विठ्ठलाची दिंडी अखंडपणे कायम सुरू राहिली. पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन जनयात्रा म्हणून ओळखली जाते. अषाढी एकादशीचे विहंगम दृश्य कोणीच विसरू शकत नाही. हजारो-लाखो भाविक वारीत सहभागी होतात. शेवटी सर्व पंथ हे भागवत पंथच आहेत,” असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केलं.
‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना भगवान विठ्ठलापासून मिळणाऱ्या प्रेरणेतून निर्माण झाली आहे. माझं पंढरपूरशी विशेष नातं आहे. भगवान द्वारकाधीश इथे येऊन विठ्ठल रुपात विराजमान झाले. दुसरं नातं म्हणजे माझं काशीशी नातं आहे आणि पंढरपूर हे आमच्यासाठी दक्षिण काशी आहे,” असं मोदी म्हणाले. “या भूमीने संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ आणि संत तुकारामांसारखे संत आणि नवीन ऊर्जा दिली. विठूमाऊलीच्या दर्शनाने डोळ्यांचे पारणे फिटते, पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका नेणारे ठरतील,” असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
“वारकरी चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या आमच्या बहिणी, देशाची स्त्री शक्ती! पंढरीची वारी संधीच्या समानतेचे प्रतीक आहे. ‘भेदाभेद अमंगळ’ हे वारकरी चळवळीचे ब्रीदवाक्य आहे,” असं मोदी म्हणाले.
“रस्ते हे विकासाचे द्वार असते असं आपण म्हणतो. पंढरीकडे जाणारे हे रस्ते भागवत धर्माची पताका उंच फडकवणारे ठरतील,” असं मोदी म्हणाले.