PM Narendra Modi On Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदी पाणी वाटपाचा करार रद्द करण्यासह भारतातील पाकिस्तानी नागरिकांनाही देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक महत्वाच्या बैठका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पाहता भारतीय लष्कर कधीही कारवाई करू शकतं, अशा भितीने पाकिस्तानची चलबिचल वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू नदी पाण्याच्या कराराबाबत मोठं विधान केलं आहे.
“भारताच्या हक्काचं पाणी आधी बाहेर जात होतं, पण आता भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार आणि भारताच्याच उपयोगी येणार”, असं सूचक विधान करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एबीपी नेटवर्कच्या इंडिया@२०४७ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी तिहेरी तलाकासह रँक वन पेन्शन योजनेसह आदी विषयांवर भाष्य करत राष्ट्र प्रथम हा एकमेव उद्देश समोर असल्यानंतर देशाचा विकास कोणीही थांबवू शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“अनेक वर्ष आपल्या नद्यांच्या पाण्याला तणावाचा आणि वादाचा विषय बनवला गेला. मात्र, आमच्या सरकारने देशातील राज्य सरकारबरोबर मिळून नद्यांना जोडणारं एक अभियान सुरु केलं. या अभियानाच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे. आजकाल माध्यमांमध्ये पाण्याच्या मुद्यांवरून (सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द) मोठी चर्चा सुरु आहे. याआधी भारताच्या हक्काचं पाणी देखील बाहेर जात होतं. मात्र, आता भारताच्या हक्काचं पाणी भारतासाठीच वाहणार आणि भारताच्या हक्कासाठी थांबणार, तसेच फक्त भारताच्याच उपयोगी येणार”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.