PM Narendra Modi on Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ जणांनी प्राण गमावले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारही आक्रमक झाले असून पाकिस्तानविरोधात शड्डू ठोकला आहे. पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी पावलं उचलली जात असतानाच त्यांनी दहशतवाद्यांनाही थेट इशारा दिला आहे. आता कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली जाणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत म्हटलंय. ते बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने बोलत होते.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन मिनिटे मौन पाळून या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. तर भाषण संपता संपता त्यांनी दहशतवाद्यांना जाहीर भाषणातूनच थेट इशारा दिला. “मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना ओळखेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षा करेल. ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हल्ल्याचं कटकारस्थान रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना शिक्षा मिळणारच. आता दहशतवाद्यांना मातीत मिळवण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचं कंबरंडं मोडणार आहे.”

नरेंद्र मोदींचं थेट इंग्रजीतून भाषण

महत्त्वाचं म्हणजे बिहारमध्ये हिंदीतून भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक इंग्रजीतून भाषण सुरू केलं. भारताच्या स्पिरिटवर हल्ला करणाऱ्यांना भारत सोडणार नाही, असा जगाला इशारा देत असताना त्यांनी इंग्रजीतून भाषण केलं. ते म्हणाले, बिहारच्या मातीत उभं राहून मी जगाला सांगू इच्छितो की भारत या दहशतवाद्यांची ओळख पटवेल, त्यांचा माग काढेल आणि त्यांना शिक्षाही देईल. पृथ्वीच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचा माग काढू. भारताचं स्पिरिट आम्ही अशा दहशतवादी कृत्यांमुळे रोखणार नाही.”

“दहशतवादाला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या संकल्पात एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे… शिक्षा महत्त्वपूर्ण आणि कठोर असेल, ज्याचा या दहशतवाद्यांनी कधीही विचारही केला नसेल…” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.