नवी दिल्ली : भूकंपग्रस्त तुर्कस्तानमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारताच्या मदत व आपदा निवारण पथकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कौतुक केले. गेल्या काही वर्षांत भारताने स्वत:ची ओळख केवळ स्वयंपूर्ण देश म्हणूनच नव्हे, तर नि:स्वार्थी देश म्हणून बळकट केली आहे, असे ते म्हणाले.

 भूकंपग्रस्त तुर्कस्तानला शक्य ती सर्व मदत करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिल्यानंतर, राष्ट्रीय आपदा निवारण दलाची (एनडीआरएफ) एकूण तीन पथके ७ फेब्रुवारीला तेथे पाठवण्यात आली होती. भारतीय लष्कराचे वैद्यकीय पथकही  भूकंपग्रस्त लोकांच्या सेवेसाठी तेथे तैनात करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुम्ही मानवतेची मोठी सेवा केली असून, भारताला अभिमान वाटावा असे काम केले आहे. आम्ही जग हे एक कुटुंब असल्याचे मानतो आणि संकटात त्याच्या कुठल्याही सदस्याला त्वरित मदत करणे हे आमचे कर्तव्य असल्याचे समजतो’, असे भूकंपग्रस्त तुर्कस्तानहून परतलेल्या पथकांच्या कर्मचाऱ्यांना संबोधित करताना मोदी म्हणाले. जगात कुठेही संकट उद्भवते, तेव्हा प्रतिसाद देणारा पहिला देश होण्यास भारत तयार असतो, असेही त्यांनी सांगितले.