India-Pakistan Conflict: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतासोबत संघर्ष होण्याची भीती असल्याने पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) रहिवाशांना अन्न, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याचे आदेश दिले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने सीमेवर सलग आठ वेळा गोळीबार केला आहे. भारताने आपल्या लष्कराला पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिल्यानंतर, पाकिस्तानातून आता दावे करण्यात येत आहेत की, भारत त्यांच्यावर हल्ला करणार असल्याची गुप्तचर माहिती त्यांच्याकडे आहे. तणाव वाढत असताना दोन्ही देशांनी त्यांच्या राजदूतांना परत बोलावले असून, सीमा बंद केल्या आहेत.

नियंत्रण रेषेच्या भागात पर्यटन बंदी

पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर जारी केलेल्या आदेशानुसार, नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या रहिवाशांना अन्न आणि आवश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितले आहे. तसेच, नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या इतर लगतच्या भागात पर्यटकांचा प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तसेच जाहीर केलेल्या अनेक उपाययोजनांमध्ये पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील धार्मिक मदरसे बंद करणे, तसेच लष्करी संघर्ष झाल्यास करावयाच्या मदत उपाययोजनांना पाठिंबा देण्यासाठी १ अब्ज रुपयांचा आपत्कालीन प्रतिसाद निधी स्थापन करणे यांचा समावेश होता.

पीओके मधील संरक्षण दर अलर्ट

याव्यतिरिक्त, नीलम, झेलम, पूंछ, हवेली, कोटली आणि भिंबर यासारख्या प्रमुख नियंत्रण रेषेतील मतदारसंघांमध्ये रस्ते खुले राहावेत यासाठी अधिकृत आणि खाजगी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत.

पीओकेमधील नागरी संरक्षण दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने रहिवाशांना कोणत्याही तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्यास आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२२ देखील जारी केली आहे.

भारत लष्करी कारवाई करण्याची भीती

पीओकेमधील अधिकारी नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय सीमेवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह वरिष्ठ भारतीय नेत्यांनी लष्करी कारवाई आणि योग्य लष्करी प्रत्युत्तर देण्याच्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर, कराची आणि लाहोरमधील प्रमुख पाकिस्तानी विमानतळांवरील हवाई क्षेत्र दररोज सुमारे आठ तास बंद ठेवण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे पाकिस्तानवर निर्बंध

पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २५ पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. याचाच भाग म्हणून भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादल आहेत. याचबरोबर सिंधू जल करारही स्थगित केला आहे. दरम्यान जगभरातील अनेक देशांचे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील घडामोडींवर लक्ष असून, अमेरिकेसह अनेक देशांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.