योगेंद्र यादव, राहुल शास्त्री, श्रेयस सरदेसाई
अवघ्या ४९ जागांवरच सोमवारी- २० मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान होत असल्याने हा संख्येने सर्वांत छोटा टप्पा ठरतो खरा; पण हा टप्पा निवडणूक निकालांवर मोठा परिणाम घडवण्याची क्षमता असलेल्या मतदारसंघांत पार पडतो आहे.
महाराष्ट्रात मुंबईतील सहाही जागा, उत्तर प्रदेशात रायबरेली, अमेठी आणि फैझाबाद (अयोध्या), तसेच बिहारमधील सारण (पूर्वीचे छपरा) आणि हाजीपूर हे मतदारसंघ प्रतिष्ठेचे मानले जातात. या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याप्रमाणेच सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नुकसान पाचव्या टप्प्यातही संभवते. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ४९ पैकी ३९ जागा ‘रालोआ’ने, त्याहीपैकी ३२ एकट्या भाजपने मिळवल्या होत्या. ‘इंडिया’ आघाडीतील सर्व पक्षांना मिळून त्या वेळी आठच जागा जिंकता आल्या होत्या. यंदा मात्र हा आठाचा आकडा दुप्पट होऊ शकेल किंवा ‘रालोआ’ला मिळालेली ३१ जागांची आघाडी अवघ्या १७ जागांपर्यंत कमी होऊ शकेल, इतका मताधार २०१९ नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडिया’तील पक्षांनी मिळवला होता. त्यातही, उत्तर प्रदेशातील विधानसभा क्षेत्रांमध्ये मत-टक्केवारीच्या आधारे ‘इंडिया’तील पक्षांनी गेल्या चार वर्षांत अधिक जनाधार मिळवला. हे राज्य भाजप व ‘रालोआ’साठी कसोटीचे ठरणार आहे.
हेही वाचा >>>मोसमी वारे भारताच्या सीमेत.. निकोबार बेटांवर बरसात
अमेठीही काँग्रेसकडे?
उत्तर प्रदेशातील १४ मतदारसंघ या टप्प्यात आहेत. अवध, पूर्वांचल, दोआब आणि बुंदेलखण्ड भागांमध्ये विखुरलेले हे मतदारसंघ असून त्यापैकी १३ भाजपनेच मिळवले होते, तर काँग्रेसला केवळ रायबरेलीची जागा राखता आली होती. मात्र २०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील मत-हिस्सा लक्षात घेतल्यास, यंदा काँग्रेस रायबरेलीची जागा (आता राहुल गांधींसाठी) राखेलच, पण अमेठी व बाराबंकी या मतदारसंघांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये मिळालेला मत-टक्का टिकवून ठेवल्यास या दोन जागाही काँग्रेसकडे जातील. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष हा काँग्रेसचा ‘मोठा भाऊ’ ठरतो आहे. अखिलेश यादव यांच्याकडे नेतृत्व आल्यानंतर २०१९ मध्ये एकही लोकसभा जागा ‘सप’ला मिळवता आली नव्हती. परंतु कौशंबी, फतेहपूर आणि बांदा या जागांमधील विधानसभा क्षेत्रांतला २०२२ चा जनाधार टिकवल्यास यंदा या पक्षालाही तीन जागांची आशा आहे. फैजाबाद मतदारसंघात अयोध्या हा एक भाग आहे. येथे आणि आजूबाजूच्या भागात तरी मतदानाची टक्केवारी यंदा वाढते का हे पाहणे मनोज्ञ ठरेल; कारण आतापर्यंत उत्तर प्रदेशाच्या इतर भागांमध्ये २०१९ च्या तुलनेत कमी मतदान झाले, असा यंदाच्या आदल्या टप्प्यांचा अनुभव आहे.
असली-नकलीची लढाई
महाराष्ट्रात या टप्प्यासोबतच निवडणूक संपत असली तरी उद्धव सेना आणि शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातील ‘असली-नकली’ कोण, याच्या फैसल्यासाठी पंधरवडाभर थांबावे लागेल. या टप्प्यात मुंबई शहर, उपनगरे मिळून एकंदर सहा मतदारसंघ, शिवाय ठाणे- कल्याण पनवेलपर्यंतचा भाग आणि भारताची कांदा-राजधानी ठरलेला नाशिक भाग तसेच एकेकाळी हातमाग उद्याोगामुळे भरभराटीला आलेला पण आता गतवैभव गमावलेला मालेगाव-धुळे हा पट्टा.
हेही वाचा >>>‘आप’ला संपवण्याची मोहीम! केजरीवाल यांचा भाजपवर आरोप; भाजप मुख्यालयाबाहेर कडेकोट सुरक्षा
उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई आणि ठाणे या पट्ट्यात खरी लढाई आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी भिवंडी आणि दिंडोरी हे मतदारसंघ महत्त्वाचे आहेत.
पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये ‘इंडिया’ आघाडीला फार अधिक लाभाची आशा धरता येणार नाही. बिहारमध्ये, राष्ट्रीय जनता दलातर्फे छपरा (आता सारण) या एकेकाळच्या लालूंच्या बालेकिल्ल्यात आपला पाया पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु बिहारच्या मिथिलांचल पट्ट्यातील काही जागा रालोआसाठी अनुकूल आहेत, त्यात दिवंगत रामविलास पासवान यांचा हाजीपूर मतदारसंघ आहे, जो आता त्यांचे चिरंजीव ‘रालोआ’चा घटक म्हणून लढवत आहेत.
भाजप, रालोआला आशा
पश्चिम बंगालमध्ये उत्तर २४ परगणा, हुगळी आणि हावडा या जिल्ह्यांतील सात जागांवर मतदान होणार आहे, यापैकी बराकपूर आणि हुगळीमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार भाजपला यंदा या जागा राखण्यासाठी बरीच तोशीस पडेल असे दिसते; परंतु ते तृणमूलकडून आरामगाभ हा मतदारसंघ हिसकावून घेऊ शकतात.
झारखंडमधील कोडरमा मतदारसंघात ‘इंडिया’ ला विजयाची आशा आहे, कारण येथे विद्यामान ‘सीपीआय-एमएलएल’ पक्षाचे आमदार लोकसभेचे उमेदवार आहेत. तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन याही कोडरमाच्या एका विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत.
लोकसभेसोबत विधानसभेचीही निवडणूक होत असलेल्या ओडिशात भाजपला, २०१९ मध्ये लोकसभेसाठी मिळवलेल्या जागा टिकवून ठेवण्याची आशा या टप्प्यात निश्चितपणे आहे. पाच लोकसभेच्या जागा आणि ३५ विधानसभा जागांचा हा टप्पा आहे. यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांभेही भवितव्य पणाला लागले आहे. लोकसभेच्या पाच जागांपैकी राज्याच्या पश्चिम भागात असलेल्या बारगाह, सुंदरगड आणि बोलांगीर या तीन जागा भाजपने २०१९ मध्ये जिंकल्या होत्या तर मध्य ओडिशातील कंधमाल व आस्का या जागा सत्ताधारी बिजू जनता दलाकडे होत्या. हा निकाल यंदाही तसाच राहील अशी शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरच्या बारामुला आणि लडाखच्या जागेवरही या टप्प्यात लक्ष राहील. नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांच्यासमोर यंदा बारामुल्ला मतदारसंघात तुरुंगातून निवडणूक लढवत असलेल्या ‘ इंजीनिअर रशीद’चेही आव्हान असून त्यामुळे येथे तिरंगी लढत होते आहे.
भाजपसाठी हा टप्पा कसोटीचा अशासाठी की, यापूर्वीच्या चार टप्प्यांमध्ये मिळून जवळपास ४० जागांचे नुकसान होण्याची भीती असताना, आणखी जागा गमावणे भाजप किंवा ‘रालोआ’ साठी धार्जिणे नाही. पाचवाच नव्हे तर यापुढलेही दोन्ही टप्पे भाजपसाठी अटीतटीचे असणार आहेत.
‘दोन म’
मुंबईतल्या शिवसैनिकांचा कल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिसलेला आहे. परंतु यंदा उद्धव ठाकरे हे ‘दोन म’ चे समीकरण जुळवण्यात यशस्वी झालेले दिसताहेत. मराठी माणूस आणि मुस्लीम हे ते दोन म… कधीकाळी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हे ‘दोन म’ एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून दिल्लीच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध मैदानात उतरले होते, शाहीर अमरशेखांचा आवाज दोघांनाही प्रेरणा देत होता. पण आता परिस्थिती निराळी आहे. दुसरा म शिवसेनेशी जोडला गेला आहे तो अस्मितावादामुळे नव्हे तर कोविड-काळात मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी जे काम केले, भेदभाव न ठेवता सर्वांवर उपचार व्हावेत यासाठी जी शर्थ केली, त्याचा परिणाम आता दिसतो आहे. अर्थात, उद्धव ठाकरे हे राडेबाज नेते म्हणून प्रसिद्ध नाहीत, हाही घटक आहेच.