‘सत्ता हे विषच आहे. मात्र, जबाबदारीपासून पळणेही योग्य नाही. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे’, असे स्पष्ट करत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या बोहल्यावर चढण्यास आपण तयार असल्याचे संकेत दिले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी पक्षासाठी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आता त्यावर १७ जानेवारीला होत असलेल्या काँग्रेस कृतीसमितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.
भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्याने गेल्या काही दिवसांपासून राहुल यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सपशेल पराभव झाल्यानंतरही या मागणीत घट झाली नाही. त्यावर पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, ‘सत्ता हे विष असले तरी मी जबाबदारीपासून पळू शकत नाही. पक्षासाठी इच्छा किंवा अनिच्छेला महत्त्व नाही. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी स्वीकारेन. यापूर्वीदेखील सोपवलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली’. घराणेशाहीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, माझ्या कुटुंबातील कुणीही सत्तेसाठी राजकारण केले नाही. पक्षाने सोपवलेली प्रत्येक जबाबदारी माझी आजी, वडिलांनी स्वीकारली व प्रामाणिकपणे पार पाडली.
काँग्रेसमध्ये लोकशाहीच
काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचा दावा करीत राहुल यांनी सांगितले की, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. जनताच आपला नेता निवडते. भाजप देशात हुकूमशाही आणण्याच्या इराद्यात असल्याची टीका त्यांनी केली. भाजपला एकाच व्यक्तीभोवती केंद्रित सरकार हवे आहे. भारतात हे शक्य नाही. काँग्रेसमुक्त भारताची स्वप्ने पाहणाऱ्यांना काँग्रेसच्या शक्तीची कल्पना नाही. भारताला अखंड राखण्यासाठी काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. काँग्रेस पक्षात साऱ्याच चांगल्या गोष्टी नाहीत, हे राहुल गांधी यांनी मान्य केले. अनेक चागंल्या गोष्टी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना सुचवल्या आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे सांगत राहुल यांनी येत्या अधिवेशनात भ्रष्टाचारविरोधी विधेयके मंजूर करणार असल्याचे संकेत दिले.
प्रसारमाध्यमे फक्त पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचीच चर्चा करतात. ही चर्चा इथेच का थांबते, यापेक्षा इतर महत्त्वाच्या गोष्टी नाहीतच का? राजकीय सुधारणांवर कोणालाही बोलायचे नसते. प्रियंकाने अलीकडेच काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत भाग घेतला. त्यानंतर लगेचच तिच्या राजकारणप्रवेशाच्या वावडय़ा उठल्या. राजकारणात यायचे की नाही हा सर्वस्वी तिचा निर्णय असेल. ती माझी बहीणच नव्हे तर एक चांगली मैत्रीणही आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
विषाची परीक्षा घ्यायला हवी..
‘सत्ता हे विषच आहे. मात्र, जबाबदारीपासून पळणेही योग्य नाही. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे’,

First published on: 15-01-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power is poison but i have no reluctance will do what congress asks me to rahul gandhi