“देशभरात मोठ्या प्रमाणावर करोना बाधित रुग्ण संख्या वाढत होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणे या मुद्याला दिले. तर या निवडणुकीत मोदी आणि शाह या दोघांनी मिळून २९४ सभा घेतल्या. तर एका बाजूला करोना वाढताना, मोदी नीरोसारखं वागत होते. रोम जळताना नीरो व्हॉयलीन वाजवत होता. तसं मोदी यांच लक्ष बंगालवर होते,” अशा शब्दांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे बांगलमध्ये पुन्हा तृणमुल काँग्रेसने तिथे सरकार स्थापन करावं, अशी आमची अपेक्षा असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं.

“पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी यांनी या निधीचा वापर करू सांगितले. त्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहे. यातून काय हे काय साध्य करीत आहे,” अशा शब्दात केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर आंबेडकरांनी निशाणा साधला.

आणखी वाचा- Corona: भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट; साडे तीन लाखांहून अधिक रुग्ण तर २८१२ रुग्णांचा मृत्यू

…तर आम्ही राज्यभरात आंदोलन करणार

सिरम इन्स्टिट्यूटची ज्या देशांनी आपल्या येथून लस घेतली. त्या सर्वांना तीन डॉलर ते पाच डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र ज्या देशात आणि आपल्या पुण्यात उत्पादन होणारी लस आपल्या सर्वांना जवळपास १२०० रुपयांना लस मिळणार आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत. ही लस आम्हाला, सरकारला मिळणार्‍या १५० रुपयात मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.