राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. राहुल गांधींनी या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णयही जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरातील भाजपा कार्यकर्ते-पदाधिकारी आणि नेतेमंडळींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, ब्रिटिशांनी जाताना जनतेला गुलाम बनवण्याची मानसिकता यांच्या मनात सोडली, असंही मोदी म्हणाले.

“काँग्रेस म्हणजे छोटी स्वप्नं आणि त्याहून छोटं यश”

“हे सगळे लोक वंशवाद, परिवारवाद, जातीवाद, श्रेत्रवाद याचे बंधक झाले आहेत. भाजपाची राजकीय संस्कृती प्रत्येक देशवासीयाला सोबत घेऊन चालण्याची आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांची संस्कृती छोटा विचार करायचा, छोटी स्वप्नं बघायची आणि त्याहून छोटं यश मिळवून आनंद साजरा करायचा, एकमेकांची पाठ थोपटायची अशी आहे. भाजपाची राजकीय संस्कृती मोठी स्वप्नं बघणं आणि त्याहून जास्त मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करणं ही आहे”, असा टोला मोदींनी यावेळी लगावला.

“…हे काँग्रेसला पचतच नाहीये”

“भारत स्वच्छ अभियान, शौचालय देण्याची घोषणा मी केली, तेव्हा हेच लोक काय काय बोलायचे. जेव्हा आपली मस्करी करण्यात ते यशस्वी झाले नाहीत, तेव्हा बादशाही मानसिकतेच्या या लोकांचा द्वेष अजून वाढला. त्यांनी कधी विचारच केला नव्हता की अनेक दशकांपासून हिंसेच्या समस्येनं ग्रस्त जम्मू-काश्मीर आणि पूर्वेकडची राज्य शांततेत राहतील. कलम ३७० कधी हटेल असं त्यांना वाटलं नव्हतं. भाजपा जसं काम करतेय, ते यांना पचतच नाहीये. त्यामुळे या द्वेषातून ते आज खोट्यावर खोटं बोलत आहेत”, अशा शब्गांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीका केली.

“या लोकांना एक गोष्ट माहिती नाहीये की…”

“भ्रष्टाचाराचा खुलासा होताना पाहून ते अस्वस्थ आणि हताश झाले आहेत. आता हे लोक इतके हताश, निराश झालेत की त्यांना एकच मार्ग दिसतोय. आता ते खुलेपणाने म्हणतायत की मोदी तेरी कबर खुदेगी. ते आता कबर खोदण्याची धमकी देतायत. बादशाही मानसिकतेच्या या लोकांना, पक्षांना एक गोष्ट माहिती नाहीये. आज देशातला गरीब, सामान्य माणूस, युवक, महिला, दलित, पीडित, वंचित, अदिवासी असे सगळे भाजपाचं कमळ फुलवण्यासाठी, त्याच्या संरक्षणासाठी ढाल बनून उभे राहिले आहेत”, असं मोदी यावेळी म्हणाले.

BJP Anniversary: “या लोकांच्या बादशाही मानसिकतेमुळे…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपल्या अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या या पक्षांकडून आपल्याविरोधात कट-कारस्थानं चालूच राहतील. पण आपण देशवासीयांच्या स्वप्नांना, आकांक्षांना दबले जाताना पाहू शकत नाही. त्यामुळे आपला जोर देशाच्या विकासावर आहे. देशवासीयांच्या कल्याणावर आहे”, असं ते म्हणाले.