गांधीनगर : ‘‘दहशतवाद हे पाकिस्तानने भारताविरोधात पुकारलेले छुपे युद्ध नसून जाणीवपूर्वक आखलेले युद्धधोरण आहे,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमध्ये केली. भारत पाकिस्तानला त्याच पद्धतीने उत्तर देईल असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. गुजरात सरकारने आयोजित केलेल्या शहर विकास कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मोदी म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा आमचा संस्कार आहे. आम्हाला आमच्या शेजाऱ्यांनीही आनंदात राहावे असे वाटते पण जर तुम्ही आमच्या सामर्थ्याला आव्हान दिले तर भारतही नायकांची भूमी आहे. दहशतवादाला पाठिंबा देऊन पाकिस्तान भारताविरुद्ध युद्ध करत आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

पंतप्रधान मोदी सोमवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आपल्याला बडोदा, दाहोद, भूज, अहमदाबाद आणि गांधीनगर येथे ऑपरेशन सिंदूरच्या यशाबरोबर देशभक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला असे ते म्हणाले. हीच भावना देशभर असणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांचा दोन दिवसांत चौथा रोड शो

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मंगळवारी सकाळी गांधीनगरमध्ये भव्य ‘रोड शो’ आयोजित करण्यात आला. या वेळी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. आपल्या दोन दिवसांच्या गुजरात भेटीत बडोदा, भूज आणि अहमदाबादनंतर मोदी यांचा हा चौथा ‘रोड शो’ होता. केला. राजभवनपासून सुरू झालेला हा ‘रोड शो’ महात्मा मंदिरपर्यंत सुरू होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथम पंतप्रधान नेहरूंवर टीका

स्वातंत्र्यानंतर १९४७मध्ये भारतात शिरलेल्या मुजाहिदीनांना आपण ठार करायला हवे होते, तसे झाले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती असे म्हणत मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांवर टीका केली. पाकव्याप्त काश्मीर परत घेईपर्यंत भारतीय सैन्याने थांबता कामा नये असे सरदार पटेल यांचे मत होते, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा दावाही मोदी यांनी केला.