केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
देशातील डाळींचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचितच जास्त येण्याची शक्यता असल्याने वाढती मागणी आयातीद्वारे भरून काढण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येत असल्याचे केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.
यंदा देशातील उत्पादन किंचित जास्त असेल, मात्र ते गेल्या वर्षी इतकेच म्हणजेच १७२ लाख टन ते १७५ लाख टन असेल असे आपल्याला वाटते. त्या तुलनेत आपली मागणी २३५ लाख टन इतकी आहे, असे पासवान म्हणाले. देशातील उत्पादन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही समस्या आयात पद्धतीनेच सोडवावी लागेल, असेही ते म्हणाले.
तुटवडय़ावर मात करण्यासाठी सरकारने आयातीची योजना आखली आहे. आयातीसाठी शक्य तितक्या लवकर परवानगी द्यावी, अशी विनंती आम्ही वाणिज्य विभागाला केली आहे. काही राज्यांमध्ये डाळींची साठवणूक करण्यात येत आहे, भारतीय अन्न महामंडळ डाळी खरेदी करीत आहेत, असेही ते म्हणाले.
मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेल्या तफावतीमुळे केवळ डाळींच्या किंमतीतच वाढ होत आहे आणि कमी उत्पादन हे त्यामागील कारण आहे. यंदा डाळीच्या उत्पादनात २० लाख टनाची तूट आहे, असे ते म्हणाले. आपण ४५ लाख टन डाळ आयात केली असली तरी अद्याप ११ लाख टन डाळीची गरज आहे, असेही ते म्हणाले.