Instagram Video: कतारचा रहिवासी असलेल्या १७ वर्षीय मोहम्मद जुईतेम याने काही दिवसांपूर्वी, तो भारतात का स्थलांतरित झाला याचे स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, “आंतरराष्ट्रीय उद्योजक” म्हणून स्वतःची ओळख करून देणाऱ्या जुईतेम याने भारतातील त्यांचे अनुभव शेअर केले असून, जगातील सर्वात श्रीमंत देश असलेल्य कतार आणि जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या व वैविध्यपूर्ण देश असलेल्या भारतातील जीवनशैलीतील फरकावर प्रकाश टाकला आहे.
१७ वर्षीय तरुणाने कतारमधील आरामदायी जीवन सोडून भारतात का स्थलांतरित झाला याची कारणे एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. ते म्हणाला, “मी जगातील सर्वात श्रीमंत देश सोडून भारतात राहण्यासाठी आलो आहे. आमच्या देशामध्ये जीवन आरामदायी आणि अपेक्षेप्रमाणे चालते. पण इथे सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. इथे प्रत्येकजण अथक परिश्रम करत असतो आणि कोणालाही आराम मिळत नाही असे दिसते.”
मोहम्मद जुईतेम या व्हिडिओमध्ये पुढे भारताच्या “घडपळीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीचे” कौतुक केले, स्थानिक लोक त्यांच्या ध्येयांबद्दल आणि महत्त्वाकांक्षांबद्दल कसे उत्कटतेने बोलतात व ते साध्य करण्यासाठी दिवसातून १० तासांपेक्षा जास्त कसे काम करतात याबाबत भाष्य केले आहे. तो म्हणाला, “ही चिकाटी, आवड आणि शिस्त आहे. यामुळे ते फक्त टिकून राहत नाहीत, तर ते स्व:ताला घडवत आहेत, नवोन्मेष घडवत आहेत आणि काहीतरी निर्माण करत आहेत.”
या व्हिडिओवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी त्याच्या कंटेंटचे कौतुक केले आहे, तर काहींनी त्याने भारताला “अपमानित” केल्याबद्दल टीका केली आहे.
“हा कदाचित विनाकारण दुसऱ्या देशाची बदनामी करण्यासाठी सर्वात श्रीमंत देश सोडून आला आहे”, असे एका युजरने म्हटले आहे. तर, दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हा कंटेंट भारताला अपमानित करण्यासाठी बनवण्यात आली आहे, सर्वच देशात सर्व काही सारखे नसते.”
तिसरा म्हणाला, “अरे, तर मग तू तुमचे ‘समृद्ध आणि आरामदायी जीवन’ सोडून व्यवसायासाठी भारतात आला आहे आणि काही धक्कादायक खुलासा केल्यासारखे कचरा का चित्रित करत आहे? भाऊ, लक्षात घे, तू इथे पैसे कमवण्यासाठी आला आहे, माहितीपट बनवण्यासाठी नाही.”