नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पारंपरिक अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असे लक्षवेधी विधान उत्तर प्रदेशचे नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी केल्यामुळे राजकीय तर्कवितर्क केले जात आहेत. शिवाय, विरोधकांच्या महाआघाडीमध्ये अजून जागावाटपाबद्दल चर्चा झाली नसली तरी, उत्तर प्रदेशमध्ये अधिकाधिक जागा पदरी पाडून घेण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे. त्यामुळेही राय यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. राजीव गांधी व सोनिया गांधी यांच्यानंतर सलग १५ वर्षे राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघाचे संसदेमध्ये प्रतिनिधित्व केले होते. मात्र, २०१९ मध्ये पराभवाची शक्यता लक्षात घेऊन राहुल गांधींनी अमेठी व केरळमधील वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. वायनाडमधील मतदारांचे गणित काँग्रेससाठी अनुकुल ठरले तरी, अमेठीमध्ये विद्यमान केंद्रीयमंत्री स्मृति इराणी यांनी सुमारे ५० हजार मतांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी पुन्हा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतील, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये होत असली तरी, वरिष्ठ नेत्यांनी दुजोरा दिलेला नव्हता. मात्र, शुक्रवारी पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष पदावरील नेत्याने राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढण्याच्या शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसच्या प्रदेश संघटनेमध्ये बदल केले जात असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजय राय या ब्राह्मण नेत्याची गुरुवारी प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राय यांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी-वढेरा यांच्या संदर्भात टिप्पणी केली आहे. विरोधकांच्या महाआघाडीची मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी बैठक होणार असून ‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा झालेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची फारशी ताकद नसली तरी अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. राहुल गांधी पुन्हा अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवणार असतील तर, महाआघाडीमध्ये काँग्रेसला बळ मिळेल असे मानले जात आहे. .. अन प्रियंका वाराणसीमधून? प्रियका गांधी यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर त्या उत्तर प्रदेशमधून कुठल्याही मतदारसंघातून लढू शकतात, अगदी वाराणसीमधूनही लढू शकतील. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ व २०१९ या सलग दोन लोकसभा निवडणूक लढवली असून तिसऱ्यांदाही मोदी वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये राय यांनी केलेल्या विधानावर दिल्लीतील एकाही वरिष्ठ काँग्रेस नेत्याने अद्याप मतप्रदर्शन केलेले नाही.