देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं राजकीय जीवन अत्यंत क्रूर पद्धतीने संपवण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी केला आहे. त्या २५ व्या राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार सोहळ्यात बोलत होत्या. राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील जवाहर भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सोनिया गांधी म्हणाल्या की, “राजीव गांधी यांनी अल्पावधीत यश संपादन केले होते. महिला सक्षमीकरणासह देशाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं. परंतु, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने झाला.”

महिला सक्षमीकरणासाठी राजीव गांधी यांचं योगदान

“आज ग्रामीण आणि शहरी भागात १५ लाखांहून अधिक महिला लोकप्रतिनिधी निवडून आल्या आहेत, त्यामागे राजीव गांधी यांचे परिश्रम आणि दूरदृष्टीच कारणीभूत आहे. त्यांनीच पंचायत आणि नगरपालिकांमध्ये महिलांच्या एक तृतीयांश महिला आरक्षणासाठी संघर्ष केला होता. याच सरकारने मतदानाचे वय २१ वरून १८ केले होते”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सध्याच्या काळात द्वेष, समाजात फूट पाडणे, धर्मांधता आणि पक्षपाताचे राजकारण वाढवणाऱ्या शक्ती अधिक सक्रिय होत असल्याने जातीय सलोखा, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे आदर्श अधिक महत्त्वपूर्ण झाले आहेत. राजीव गांधी हे भारतातील सर्वधर्मसमभावाचे समर्थक होते. धार्मिक, जात, भाषा आणि संस्कृती साजरे करूनच भारताची एकात्मता बळकट केली जाऊ शकते, या वस्तुस्थितीबद्दल ते अत्यंत संवेदनशील होते”, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.