Rajnath Singh भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सनातन संस्कृती जागरण महोत्सवात सहभाग घेतला होता. दिल्लीच्या या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. मी देशाचा संरक्षण मंत्री आहे, त्यामुळे माझं हे कर्तव्य आहे की मी आपल्या सैनिकांसह आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाला जे वाटतं आहे ते होणारच असं म्हणत राजनाथ सिंह यांनी या कार्यक्रमात पाकिस्तानला इशारा दिला आहे.
राजनाथ सिंह यांनी काय म्हटलं आहे?
“आपल्या देशाकडे कुणी डोळे वटारुन पाहिले तर त्यांना मुंहतोड उत्तर देणं हे आमचं काम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सगळं माहीत आहे. तसंच तुम्हाला त्यांची कार्यशैली माहीत आहे. पंतप्रधान मोदी जोखीम पत्करु शकतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या देशाकडे डोळे वटारुन पाहणाऱ्या देशाला ते नक्की उत्तर देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींची शैली तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. मी या मंचावरुन तुम्हाला आश्वासन देतो की तुम्हाला जे वाटतं आहे तसंच उत्तर दिलं जाईल.” असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले राजनाथ सिंह?
२०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र होईल असं लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं आहे. हे लक्ष्य छोटं नाही हे तर आपण सगळेही समजू शकतो. पण तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा. हे लक्ष्य पूर्ण होणार म्हणजे होणारच. कारण हे सत्य आपण सगळ्यांनी स्वीकारलंच आहे की आपल्या देशाचा डंका आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे वाजतो आहे. आपल्या देशाची किर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढली आहे. पूर्वी अशी स्थिती होती की भारताने काहीही म्हटलं तरीही ती बाब गांभीर्याने घेतली जात नसे. भारत कमकुवत देश आहे असं म्हटलं जात होतं. आज मात्र ती परिस्थिती नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत जे म्हणणं मांडतो ते गांभीर्याने घेतलं जातं. सगळ्या जगाचं त्याकडे लक्ष असतं असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
पहलगाम बाबतची अपडेट काय?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनंतनागमध्ये २५ हून अधिक टुरिस्ट गाईड्सची चौकशी करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना हे माहीत आहे की स्थानिकांच्या मदतीशिवाय हल्ला होणं हे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत. दहशतवाद्यांना शोधण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे.