भाजपशासित राज्यांतील संघर्ष उघड गुजरातमध्ये असलेले काही सिंह मध्य प्रदेशातील अभयारण्यात सोडण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने गुजरातला दिले होते, मात्र त्यावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. आता माळढोक पक्ष्याची अंडी प्रजननासाठी कच्छला पाठविण्यास राजस्थानने नकार दिला आहे. राजस्थानने गुजरातशी संघर्षांचा पवित्रा घेतल्याने भाजपशासित राज्यांमध्ये अनेक गोष्टींवर संघर्ष सुरू असल्याची प्रचीती येत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत गुजरातला प्रजननासाठी अंडी देण्यात येऊ नयेत, असा आदेश वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिला, असे सूत्रांनी सांगितले. त्याऐवजी जेसलमेर येथे राजस्थानचा राज्य पक्षी असलेल्या माळढोक पक्ष्याच्या प्रजनन आणि संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करण्याच्या सूचना वसुंधरा राजे यांनी केल्या, असे सूत्रांनी सांगितले. या बाबत राजस्थानच्या वन्यजीव वनविभागाचे प्रमुख आर. के. त्यागी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. माळढोक पक्षीसंवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी भारतीय वन्यजीव संस्थेच्या वतीने करण्यात येत असून त्यांना गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र वन विभागाचे सहकार्य मिळत आहे. अंडी गोळा करून ती कच्छ येथे नेऊन प्रजनन करण्याचे प्रस्तावित आहे. केंद्र सरकारने पाच वर्षांसाठी ३५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. माळढोक पक्ष्याचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येत चालले असून केवळ २०० पक्षीच शिल्लक राहिले आहेत आणि त्यापैकी बहुसंख्य राजस्थानात आहेत. राजस्थानने २०१३मध्ये एक प्रकल्प राबविला होता, त्याला जास्त यश मिळाले नाही. राजस्थानातील एकाच परिसरात ९० टक्के पक्षी असताना अंडी कच्छमध्ये पाठविण्यामागे काय हेतू आहे, संवर्धनाचे प्रयत्न सुरू असतानाही गुजरातमधून सर्व माळढोक नामशेष कसे झाले, असे सवाल प्रसिद्ध लेखक विक्रम ग्रेवाल यांनी केले आहेत. मात्र ग्रेवाल यांच्या मताशी पक्षीतज्ज्ञ डॉ. असाद राहमनी हे सहमत नाहीत. कच्छमध्ये अद्यापही हरित पट्टा असल्याने तेथे माळढोक सोडून त्याचे अधिक संवर्धन करता येणे शक्य आहे, असे राहमनी यांचे मत आहे. राजस्थानला एवढी चिंता वाटत असेल तर थरच्या वाळवंटातून पक्ष गायब कसा झाला, असेही ते म्हणाले. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वाय. व्ही. झाला म्हणाले की, प्रजनन केंद्राची जागा शास्त्रोक्त पद्धतीने निवडली पाहिजे. तटवर्ती क्षेत्राच्या ठिकाणी जागा असल्यास म्हणजेच मांडवी, कच्छ येथे अधिक पोषक वातावरण, तापमान आहे आणि त्यामुळे प्रजनन चांगले होऊ शकते. जेसलमेर ही जागा प्रजननासाठी योग्य नाही, कारण तेथे कोरडे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.