पंतप्रधान मोदी यांनी आज संसदेत अविश्वास प्रस्तावावर भाषण केलं. या भाषणातून नरेंद्र मोदी मणिपूरमधील हिंसाचारावर ठोस काहीतरी बोलतील, अशी अपेक्षा विरोधी पक्षाच्या नेत्यांना होती. मात्र, या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडलं. संसदेतील मोदींच्या भाषणावर आरजेडीचे लोकसभा खासदार मनोज झा यांनी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लोकसभेतील भाषण म्हणजे टीका-टिप्पणी आणि निरर्थक विनोद होते. ते मणिपूर हिंसाचारावर बोलतील, अशी अपेक्षा होती. पण ते मणिपूर प्रश्नावर फारसं काही बोलले नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज झा यांनी दिली. ते 'एएनआय' वृत्तवाहिनीशी बोलत होते. प्रकाश झा यावेळी म्हणाले, "आम्ही विचार केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर हिंसाचारानंतर मणिपूरच्या रस्त्यावर चार पावलं चालतील. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणात टीका-टिप्पणी आणि विनोद ऐकायला मिळाले. एखाद्या लहान गटात ज्या निरर्थक गप्पा-गोष्टी होतात, तसं पंतप्रधानांनी भाषण केलं. हे पंतप्रधानांकडून अपेक्षित नव्हतं. ते आमचेही पंतप्रधान आहेत. मी स्वत: मणिपूरमध्ये जाऊन आलो. मणिपूरमधील लोक आज टीव्हीसमोर बसले असतील. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आमच्या समस्येवर मोदीजी बोलतील. आमच्या जखमेवर मलमपट्टी लावतील, असं मणिपूरच्या जनतेला वाटलं असेल. पण पंतप्रधान मोदी असं काहीही करू शकले नाहीत." हेही वाचा- “काँग्रेसशी जोडलेली प्रत्येक गोष्ट चोरीची”, पक्षचिन्हासह झेंड्याबाबत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान मणिपूर प्रश्नावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज मणिपूरच्या समस्यांना असं दाखवलं जातंय की जणूकाही गेल्या काही दिवसांमध्येच या समस्या निर्माण झाल्या आहेत. तिथल्या समस्यांची कुणी जननी असेल, तर ती काँग्रेस आहे. त्यांचं राजकारण यासाठी जबाबदार आहे. आमच्या सरकारने नॉर्थ-इस्टच्या विकासाला प्राधान्य दिलं आहे." हेही वाचा- VIDEO: “पंतप्रधान मोदी दीड तासांच्या भाषणात ९० टक्के ‘INDIA’ वर बोलले”, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया "या देशात मणिपूरपेक्षा गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पण आपण एकत्र मिळून त्या समस्यांमधून मार्ग काढला आहे. त्यामुळे आपण एकत्र मिळून चालूयात आणि मणिपूरच्या लोकांना विश्वास देऊयात. राजकारणाचा खेळ करण्यासाठी मणिपूरच्या भूमिचा वापर करू नका. सत्ताधारी बाकांवरून या मुद्द्यावर समृद्ध चर्चा झाली", असंही पंतप्रधानांनी नमूद केलं.