S Jaishankar Speaks with Taliban Leader : भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी (१५ मे) तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्ताकी यांच्याशी बातचीत केली. दोघांमध्ये फोनवरून संभाषण झालं. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं. मात्र, दोन्ही देशांनी लष्करी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवल्यानंतर (युद्धविराम) काही दिवसांनी जयशंकर व मुत्ताकी यांच्यात चर्चा झाली. काबूलमधील तालिबान राजवटीने पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला. तर, जयशंकर यांनी तालिबानच्या या निषेधाचं स्वागत केलं.
आमिर खान मुत्ताकी यांच्याशी चर्चा केल्यानंतर एस. जयशंकर यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्ट्मध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सायंकाळी अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी आमीर खान मुत्ताकी यांच्याशी महत्त्वाच्या विषयावर उत्तम चर्चा पार पडली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे. त्यांच्या या पुढाकाराचं मी स्वागत करतो. खोट्या व निराधार वृत्तांच्या आधारे भारत व अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या अलिकडच्या प्रयत्नांना त्यांनी ठामपणे नकार दिल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो”.
पाकिस्तानकडून भारत-अफगाणिस्तानमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न
अलिकडेच पाकिस्तानमधील काही वृत्तसंस्थांनी भारत व अफगाणिस्तानचे संबंध बिघडल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. भारताने अफगाणिस्तानवर क्षेपणास्र हल्ला केल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. या बातम्या हास्यास्पद असल्याचं जयशंकर यांनी म्हटलं आहे. याचाच संदर्भ देऊन मुत्ताकी यांनी उभय देशांमधील संबंध चांगले असल्याचं म्हटलं आहे.
पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला होता की भारताने पहलगाम हल्ल्यानंतर ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’अंतर्गत तालिबानला कामाला लावलं होतं. भारत तालिबानच्या मदतीने कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला होता. ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ म्हणजे अशी मोहीम ज्यामध्ये कारवाई करणाऱ्या व्यक्तीची ओळख पूर्णपणे लपवलेली असते.
एस. जयशंकर काय म्हणाले?
एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानी लोकांबरोबरची भारताची पारंपरिक मैत्री व विकासाच्या मुद्द्यावर उभय देशांचा एकमेकांना असलेला पाठिंबा अधोरेखित केला. ते म्हणाले, “मुत्ताकी यांच्याशी दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी वाढवण्याचे मार्ग व उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली. राजकीय व आर्थिक क्षेत्रात उभय़ देश संयुक्तपणे प्रयत्न करताना दिसतील”.