संभल : संभलमध्ये २४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारात सहभागी संशयितांचे फलक प्रशासनाकडून लावण्यात येणार आहेत. संभलमध्ये झालेल्या हिंसेत एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या दिवशी १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती.

जिल्हा महादंडाधिकारी राजेंदर पेनसिया यांनी सांगितले, की संभलमधील हिंसेत सहभागींचे फलक आजच सगळीकडे लावण्यात येतील. मशिदीतील सर्व्हेवरून झालेल्या हिंसेशी संबंधित ४०० लोकांची ओळख तपास यंत्रणांनी केली आहे. तसेच, शांतता समितीची बैठकही आयोजित केली असून, सर्व परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात येईल. ज्यांना अटक केली आहे, त्यांचे फलक लावली जाणार नाहीत.

हेही वाचा >>> ‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता

हिंसेशी संबंधित उर्वरित आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांनी दिली. आतापर्यंत ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसेत सहभागी ८३ लोकांची नावे समोर आली आहेत. आरोपींची ४०० छायाचित्रे एकत्र करण्यात आली आहेत. हिंसेत एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. ट्रान्सफॉर्मर जाळणे, कॅमेऱ्यांची तोडफोड, वाहनांची जाळपोळ आदींचा यात समावेश आहे. दंगलखोरांकडूनच त्याची वसुली केली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपींना पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना बक्षीसही दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशात यापूर्वीही ‘सीएए’विरोधात झालेल्या हिंसेत सहभागी संशयितांचे फलक लावण्यात आले होते.