Shashi Tharoor on Narendra Modi : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. ते मोदींचं कौतुक करत म्हणाले, “भारत व पाकिस्तानमध्ये चालू असलेल्या संघर्षादरम्यान मोदी यांनी ही नाजूक परिस्थिती खूप उत्तमपणे सांभाळली”. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहीमेबद्दल, पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर मोदींनी ज्या पद्धतीने देशाला संबोधित केलं आणि शेजारील राष्ट्राला थेट संदेश दिला त्यासाठी थरूर यांनी मोदींचं कौतुक केलं.

शशी थरूर यांनी काही वेळापूर्वी एनडीटीव्हीशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “तणावाच्या स्थितीत पंतप्रधानांनी वेळोवेळी आपल्या लोकांशी बोलायला हवं, निश्चितच ते त्यांचं आद्य कर्तव्य आहे. ते दर महिन्याला मन की बात या कार्यक्रमाद्वारे लोकांशी बोलतात. ते अत्यावश्यक किंवा प्रत्येक वेळी महत्त्वपूर्ण विषयांवर नसतं. मात्र, सध्या उद्भवलेल्या स्थितीत पंतप्रधानांनी जनतेशी बोलायला हवं”.

शशी थरूर यांचा ट्रम्प यांना टोला

थरूर यांनी यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, “ट्रम्प हे प्रत्येक गोष्टीचं श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या याच सवयीनुसार त्यांनी भारत-पाकिस्तान युद्धविरामाचं श्रेय देखील लाटण्याचा प्रयत्न केला”.

काँग्रेस खासदार म्हणाले, “मला वाटतं की पंतप्रधान मोदींनी टेलिव्हिजनवर येणं, जनतेच्या डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी बोलणं, शत्रूला रोखून पाहणं, लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करणं, त्यांच्या मनातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणं महत्त्वाचं असतं. मग ती करोनासारखी (कोव्हिड-१९) परिस्थिती असो अथवा युद्ध. आम्हाला अशा काळात पंतप्रधानांकडून अशाच अपेक्षा होत्या. त्यांनी नेमकं तेच केलं आणि याचा मला आनंद आहे. मोदी यांनी एकंदरीतच देशावरील मोठी संकटं चांगल्या प्रकारे हाताळली आहेत”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींनी पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिलाय : थरूर

शशी थरूर म्हणाले, “मी जाहीरपणे सांगतो की दहशतवादी व शत्रूराष्ट्राविरोधातीत मोहीम असो, त्या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव देणं असो ते कारवाई करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मोदींना पैकीच्या पैकी गुण देईन. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानलाही अक्कल आली पाहिजे की आम्ही त्यांच्या या अशा कारवाया सहन करणार नाही. त्यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचे मोठे दुष्परिणाम भोगावे लागतील. मला वाटतं की मोदी यांनी जगाला भारताचा स्पष्ट संदेश दिला आहे आणि पाकिस्तानलाही तो चांगलाच समजला आहे”.