लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यानंतर एका रात्रीत त्यांनी भूमिका कशी काय बदलली? महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेने याचं उत्तर द्यावं अशी खरमरीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत केली. सत्तेसाठी लोक कसे रंग बदलतात हे शिवसेनेने दाखवून दिलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज्यसभेत या विधेयकावर टीका केली तसंच या विधेयकाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यानंतर या विधेयकावर जी भूमिका मांडण्यात आली त्याला अमित शाह यांनी उत्तर दिलं. Home Minister Amit Shah, in Rajya Sabha, on #CitizenshipAmendmentBill2019: Shiv Sena supported the Bill yesterday. They should tell the people of Maharashtra as to what happened within the span of a night that they changed their stand today. pic.twitter.com/BdCl9tJanQ — ANI (@ANI) December 11, 2019 राज्यसभेत या विधेयकावर दिवसभर चर्चा सुरु होती. शिवसेना, काँग्रेस या पक्षांनी या विधेयकावर आक्षेप घेतला. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या सगळ्यांच्या टीकेला उत्तरं दिली. नागरिकत्व दुरुस्ती बिल हे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्व देण्यासाठीचं विधेयक आहे असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. या विधेयकाच्या मतदानावर शिवसेनेच्या खासदारांनी बहिष्कार टाकला. मात्र त्याआधी शिवसेनेच्या टीकेबाबत बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. लोकसभेत शिवसेनेने या विधेयकाला पाठिंबा दिला आणि एका रात्रीत शिवसेनेने भूमिका बदलली. एका रात्रीत असं काय घडलं? सत्ता राखण्यासाठी तुम्ही काय करत आहात? असे प्रश्न अमित शाह यांनी उपस्थित केले. दरम्यान या विधेयकाच्या मतदान प्रक्रियेवर शिवसेनेने बहिष्कार घातला. विरोधकांनी दिलेल्या सूचनांवरही मतदान घेण्यात आलं. आता शिवसेना अमित शाह यांच्या टीकेला काही उत्तर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.