Sonam Raghuvanshi News: जवळपास महिन्याभरापासून राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २३ मे पासून बेपत्ता असणाऱ्या राजा रघुवंशीचा २ जून २०२५ रोजी मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. ८ जून रोजी त्याची पत्नी व तोपर्यंत बेपत्ता असणारी सोनम रघुवंशी पोलिसांना शरण आली. या प्रकरणात सोनमचा लग्नाआधीचा मित्र राज कुशवाह याच्याशी तिचे प्रेमसंबंध असल्याचंही समोर आलं असून आता या प्रेमप्रकरणापेक्षाही आणखी काही हेतू राजा रघुवंशीच्या हत्येमागे असण्याचा धक्कादायक दावा पोलिसांकडून केला जात आहे.
नेमकं घडलं काय?
११ मे रोजी सोनमचं राजा रघुवंशीशी इंदोरमध्ये लग्न झालं. १९ मे रोजी ते दोघे फिरायला निघाले. गुवाहाटीच्या कामाख्या देवी मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं. तिथून पुढे शिलाँगला जात असल्याचं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं. २३ मे रोजी त्या दोघांशी कुटुंबीयांचा शेवटचा संपर्क झाला. तेव्हापासून दोघे बेपत्ता होते. पोलिसांनी बेपत्ता असल्याच्या तक्रारीवरून शोध सुरू केला. पण २ जून रोजी मेघालयमध्ये पोलिसांना राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला. यानंतर पोलिसांनी सोनमचा शोध सुरू केला. ८ जून रोजी उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमधील एका ढाब्यावर सोनम सापडली.
सोनमनंच राज कुशवाहच्या मदतीने मारेकऱ्यांना सुपारी देऊन राजा रघुवंशीची हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. राज कुशवाहला सोनम लग्नाच्या दोन वर्षं आधीपासून ओळखत होती अशी माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच दोघांनी मिळून राजाची हत्या केल्याचेही दावे केले जात आहेत. पण आता फक्त प्रेमप्रकरण हाच या हत्येमागचा उद्देश नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
मेघालयच्या डीजीपींनी काय सांगितलं?
हा गुन्हा मेघालयमध्ये घडल्यामुळे स्थानिक पोलीस त्याचा तपास करत आहेत. मेघालयच्या पोलीस महासंचालक इदाशिशा नाँगरांग यांनी सोमवारी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत वेगळीच शंका उपस्थित केली आहे. “या प्रकरणात हत्येसाठी जे काही कारण दिलं जात आहे, ते इतर तपशील पाहता रास्त वाटत नाहीये”, असं इदाशिशा नाँगरांग म्हणाल्या.
“आरोपींकडून हत्या करण्यामागचा सांगण्यात आलेला उद्देश स्वीकारणं मला अवघड जातंय. यात आणखीही काही आहे का? याचा मी शोध घेतेय. एखाद्या व्यक्तीमध्ये इतकी घृणा निर्माण होते की लग्नाच्या दोन दिवसांतच जोडीदाराची हत्या करण्याचा कट ती व्यक्ती रचते हे मान्य होणंच अवघड आहे. वरवर पाहता हा प्रेमाचा त्रिकोण वाटतोय, पण वैयक्तिकरीत्या माझा तरी हत्येमागे फक्त हाच उद्देश असल्यावर विश्वास बसणार नाही”, असं इदाशिशा नाँगरांग यांनी पत्रकार परिषदेत नमूद केलं.
सर्वच बाजूंनी पोलिसांचा तपास चालू
दरम्यान, प्रेमप्रकरणाच्या मुद्द्यासह इतर सर्वच बाजूंनी या प्रकरणाचा तपास पोलीस करत असल्याचं इदाशिशा नाँगरांग यांनी सांगितलं. “आमचा तपास चालू आहे. या प्रकरणातील अनेक वेगवेगळ्या बाबी एकत्र करून त्याचा तपास करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकरणाचं आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहात आहोत”, असंही त्यांनी सांगितलं.
सोनम रघुवंशी व राजाचा आणखी एक Viral Video
दरम्यान, सोनम रघुवंशी व राजाचा आणखी एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. हा व्हिडीओ २३ मे रोजी सकाळी ९.४५ च्यासुमारासचा असल्याचं व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने नमूद केलं. व्हिडीओमध्ये सोनम रघुवंशी आणि राजा रघुवंशी एका डोंगरावर चढताना दिसत आहेत. त्याचवेळी खाली उतरणाऱ्या एका पर्यटकानं सहज म्हणून काढलेल्या व्हिडीओमध्ये सोनम रघुवंशी व पती राजा रघुवंशी वर चढताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये सोनमनं घातलेला पांढरा टीशर्टच राजा रघुवंशीच्या मृतदेहाजवळ रक्ताळलेल्या अवस्थेत सापडला होता.
“काल मी तिथे काढलेले माझे व्हिडीओ बघत होतो तेव्हा मला अचानक इंदोरमधलं ते जोडपं माझ्या व्हिडीओमध्ये दिसलं. व्हिडीओ काढला ती वेळ साधारण सकाळी ९.४५ ची होती. आम्ही जेव्हा खाली उतरत होतो, तेव्हा सोनम आणि राजा वर जात होते. मला वाटतं त्या जोडप्याचा हा शेवटचा व्हिडीओ असावा. या व्हिडीओत सोनमनं तोच टीशर्ट घातलेला दिसतोय जो राजाच्या मृतदेहाजवळ सापडला. या व्हिडीओमध्ये मेघालय पोलिसांना आणखी धागेदोरे जुळवण्यास मदत होईल अशी मला आशा आहे”, असं या पर्यटकाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हत्येआधी नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी व राजा यांनी मेघालयमध्ये शिपारा होमस्टेमधून २३ मे रोजी पहाटे ५.३० वाजता चेकआऊट केलं. त्यानंतर पुढच्या तासाभराच ते दोघे चेरापुंजीमध्य ट्रेकिंगसाठी निघाले. पण त्याचवेळी आनंद कुर्मी, आकाश राजपूत व विशाल चौहान या तिघा मारेकऱ्यांनी तिथून काही अंतरावर असणाख्या एका होम स्टोमधून चेकआऊट केलं. ते दोघे या दाम्पत्याचा पाठलाग करत होते. सोनम रघुवंशी व राज कुशवाह या दोघांनी अत्यंत चलाखीने रचलेल्या हत्येच्या कटाचा भाग म्हणून मारेकरी या दोघांचा पाठलाग करत होते.
२३ मे रोजी सकाळी १० वाजता ट्रेकिंग करताना जवळपास २ हजार पावलं चढून गेल्यानंतर तिघा मारेकऱ्यांनी त्यांना गाठलं. जिथे ठरलं होतं तिथेच या तिघांनी राजा रघुवंशीला गाठलं. स्थानिक गाईडनंदेखील तीन मारेकरी व दाम्पत्याला एकत्र पाहिल्याचं सांगितलं आहे. यावेळी मारेकरी राजाशी बोलत चालत असताना सोनम मात्र त्यांच्या मागून चालत होती, असंही या गाईडने सांगितलं.
सोनमने ठरवून राजाच्या आईला फोन केला
दरम्यान, १२.३० वाजता सोनम रघुवंशीनं ठरवून आपल्या सासूला फोन केला. जणूकाही ते दोघे आनंदात आहेत. ट्रेक करताना फार थकवा आल्याचंही सोनमने फोन कॉलमध्ये उमा रघुवंशी यांना सांगितलं. यावेळी राजाही आईशी बोलल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पुढच्या तासाभरातच तीन मारेकरी व हे दाम्पत्य असे पाचजण मावलखियातपासून वेई सॉवडाँग येथील धबधब्याजवळ पोहोचले. त्यावेळी तिथे कुणीच नव्हतं. तिथे मारेकऱ्यांनी राजा रघुवंशीची हत्या केली आणि त्याचा मृतदेह घनदाट झाडीत एका मोठ्या खड्ड्यात फेकून दिला. आता सोनमच्या शरणागतीनंतर या प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत आहेत.