नवी दिल्ली : काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी देताना राहुल व प्रियंका गांधी यांच्या विश्वासातील नेत्यांची वर्णी लावल्यामुळे पक्षांत धुसफुस सुरू झाली आहे. पक्षप्रवक्ते पवन खेरा, आचार्य प्रमोद कृष्णम, राजस्थानमधील आमदार संयम लोढा, नगमा अशा अनेक नेते-पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने रविवारी रात्री उशिरा दहा उमेदवारांची यादी जाहीर केली.

‘‘कदाचित माझी तपस्या कमी पडली असावी,’’ असे ट्वीट करून पवन खेरा यांनी खदखद व्यक्त केली. राहुल व प्रियंका यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रीय प्रवक्ता व महासचिव रणदीप सुरजेवाला यांनाही राज्यसभेची उमेदवारी दिली गेली आहे. हरियाणातून विधानसभेची पोटनिवडणूक हरणाऱ्या सुरजेवाला यांना हरियाणामधून एक जागा रिक्त होत असतानाही राज्यस्थानमधून वरिष्ठ सभागृहात पाठवले जाणार आहे. खेरा यांनी उमेदवारी मिळालेल्या दहाही नेत्यांचे अभिनंदन केले.

राजस्थानमध्ये काँग्रेसला तीन जागा जिंकता येतील, पण या जागांवर प्रदेश नेतृत्वाकडून मागणी करूनदेखील स्थानिक उमेदवार दिला गेला नाही. तिथून सुरजेवाला, मुकुल वासनिक व प्रमोद तिवारींना संधी देण्यात आली आहे. राजस्थानमधील अपक्ष आमदार संयम लोढा यांनी काँग्रेस नेतृत्वावर टीका केली असून उदयपूर चिंतन शिबिरानंतरही काँग्रेसमध्ये कोणताही बदल झाला नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप करत, लोढा यांनी, ‘‘राजस्थानमधील काँग्रेस नेता वा पदाधिकाऱ्याला राजस्थानमधून उमेदवारी का दिली गेली नाही’’, असा सवाल त्यांनी थेट प्रियंका गांधी-वाड्रा यांना केला आहे.

गुलाम नबी आझाद ,आनंद शर्मा, तारिक अन्वर यांच्या ४० वर्षांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले गेले, अशी टीका आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केली आहे. या ज्येष्ठांना हुतात्मा का केला जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आझाद, शर्मा यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नगमा यांची नाराजी : महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या नगमा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. २००३-०४ मध्ये मी काँग्रेसमध्ये आले तेव्हा सोनिया गांधींनी मला राज्यसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यानंतर १८ वर्षे झाली, आता इम्रान यांना पक्षाने उमेदवारी दिली असून मी उमेदवारी मिळवण्यात मी कमी पडले, असे ट्वीट नगमा यांनी केले आहे. प्रियंका यांच्या आग्रहामुळे इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी दिल्याचे सांगितले जाते.