माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानंतर आता या प्रकरणात दोषी आढळलेल्या सहा जणांची सुटका होणार आहे. या प्रकरणातील एका दोषीची याआधीच १८ मे रोजी सुटका करण्यात आली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँगेसेचे नेते जयराम रमेश यांनी कोर्टाच्या या आदेशाला दुर्देवी आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा >> जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”

“राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अस्वीकारार्ह आणि अयोग्य आहे. काँग्रेस पक्ष या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त करत असून हा निकाल असमर्थनीय आहे,” असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काय आदेश दिला?

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या नलिनी श्रीहरन आणि आरपी रविचंद्रन सह सर्व सहा दोषींची सुटका करण्याचे आदेश आज (११ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये एस नलिनी, आरपी रविचंद्रन यांच्यासह संथन, मुरुगन, रॉबर्ट पायास, जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी एजी पेरारिवालन याची याआधीच सुटका करण्यात आलेली आहे. यामधील नलिनी सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे. याआधी मद्रास उच्च न्यायालयाने दोषी नलिनीची सुटकेची मागणी करणारी याचिका फेटाळली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा >> कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांचा मोठा इशारा, म्हणाले “कंपनी दिवाळखोरीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पेरारिवालन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. दोषी नलिनीने पेरारिवालनच्या बाबतीत देण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत माझीही सुटका करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणील सर्व सहा दोषींची सुटका करण्याचा आदेश दिला.