Accenture Employee: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंगळुरू येथील आय टी कंपनी एक्सेंचरच्या कर्मचाऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीशीला आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
हद्दपारीची नोटीस मिळाल्यानंतर अहमद तारिक बट या व्यक्तीने न्यायालयाकडे धाव घेतली होती आणि दावा केला होता की, त्याच्या सहा सदस्यांच्या कुटुंबाकडे भारतीय पासपोर्ट आणि आधार कार्ड असूनही त्याला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कागदपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आणि तोपर्यंत केरळच्या कोझिकोड येथील आयआयएममधून एमबीए केलेल्या बट यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला केंद्र सरकारने आव्हान दिले होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात “काही मानवी घटक” असल्याचे म्हटले आहे.
शेवटी, सर्वोच्च न्यायालयाने असेही स्पष्ट केले की या प्रकरणातील त्यांचे आदेश इतर प्रकरणांमध्ये उदाहरण म्हणून वापरले जाऊ शकत नाहीत. दरम्यान केंद्र सरकारने पाकिस्तानी व्हिसा रद्द केल्यानंतर मुस्लिम नावे असलेल्या अनेक भारतीयांना देश सोडण्यास सांगितले जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे.
या प्रकरणी शुक्रवारी सकाळी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांना बट भारतात कसे आले हे जाणून घ्यायचे होते. “तुमचा जन्म पाकिस्तानातील मीरपूर येथे झाला आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही भारतात कसे आणि का आलात?”
यावर बट यांनी सांगितले की, ते १९९७ मध्ये त्यांच्या वडिलांसोबत भारतात आले होते, ज्यांच्याकडे पाकिस्तानी पासपोर्ट होता. त्यांनी त्यांचा पाकिस्तानी पासपोर्ट जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात सादर केला, त्यानंतर त्यांनी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला आणि तो मिळवला. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य तीन वर्षांनंतर, म्हणजे २००० मध्ये श्रीनगरला आले आणि त्यांनाही भारतीय नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळाला.
बट यांनी पुढे सांगितले की, त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे पासपोर्ट, आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे असूनही, गेल्या आठवड्यात गृह मंत्रालयाच्या आदेशाने त्यांना सर्वांना देश सोडण्याची नोटीस आली होती.