scorecardresearch

RSS हे भारतामधील तालिबानी, धर्माच्या नावावर देशात फूट पाडतात; RJD च्या नेत्याची टीका

“संघाचे लोक बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारतात. आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणं गरजेचं आहे,” असं त्यांनी भाषणात म्हटलंय.

Jagdanand Singh Says RSS is Taliban in India
या वक्तव्यामुळे नवीून वाद निर्माण झालाय (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य पीटीआय आणि रॉयटर्सवरुन साभार)

बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तालिबानी विचारसणीची संघटना असं म्हटलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान जे काम करत आहे तेच काम भारतात आरएसएस करत असल्याची टीका जगदानंद यांनी केली आहे. राज्याची राजधानी असणाऱ्या पाटण्यातील पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना केलेल्या भाषणात जगदानंद यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आरएसएसची वाईट विचारसरणी भारतामधील संस्कृतीमध्ये फूट पाडण्याचं काम करत असल्याचंही जगदानंद यांनी म्हटलं आहे. आरएसएस लोकांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करते, असंही जगदानंद म्हणालेत. जगदानंद यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद यांचं यासंदर्भात समर्थन करताना दिसत आहेत. पक्षाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी जगदानंद यांचं वक्तव्य कोणत्याच पद्धतीने चुकीचं नसल्याचं सांगत त्यांची पाठराखण केलीय. आरएसएस ही संघटना कायमच देशामध्ये फूट पाडण्याचं काम करते असं त्यांना म्हणायचं असल्याचं तिवारी यांनी म्हटलंय.

जगदानंद यांनी तालिबानला धार्मिक हिंसेसाठी ओळखलं जातं असं सांगतानाच भारतामध्ये आरएसएससुद्धा हेच काम करतं, असं म्हटलं आहे. तालिबान आणि आरएसएसमधील फरक याबद्दल बोलताना जगदानंद यांनी हे वक्तव्य केलं. “तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे जी अफगाणिस्तानमध्ये आहे. आरएसएस हे भारतामधील तालिबानी आहेत. दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत. संघाच्या लोकांकडून बांगड्या विकाणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण केली जाते. आपल्याला या लोकांना थांबवायला हवं. त्यांच्याविरोधात आपण पुढे येणं गरजेचं आहे,” असंही जगदानंद यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती कारण ते आरएसएसच्या विचारसरणीच्या आधारे देशात फूट पाडू पाहत होते, असंही जगदानंद म्हणाले आहेत.

जगदानंद यांच्या या वक्तव्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. भाजपाने यावर कठोर शब्दांमध्ये टीका करताना जो ज्या परिस्थितीमध्ये राहतो त्याप्रमाणे विचार करतो अशा शब्दात टोला लगावला आहे. पक्षाचे प्रवक्ते अरविंद सिंह यांनी, “आरजेडी ज्या संस्कृतीचा पक्ष आहे त्यानुसार ते वक्तव्य करणार. जगदानंद अशाप्रकारचं वक्तव्य करतील असं वाटलं नव्हतं. मात्र आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचे गुण आत्मसात करतो,” असा टोला सिंह यांनी लगावला आहे.

सत्ताधारी जदयूचे प्रवक्ते अभिषेक झा यांनी, “जगदानंद डिरेल्ड झाले आहेत. बऱ्याच काळापासून पक्षाने त्यांचा छळ केलाय. कधी तेजस्वीमुळे तर कधी तेज प्रतापमुळे त्यांचा छळ झालाय. त्यामुळेच ते अशी वक्तव्य करत आहेत,” अशी टीका केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2021 at 08:40 IST

संबंधित बातम्या