पीटीआय, नवी दिल्ली
प्रौढ साक्षरता आणि शिक्षणाशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यात दिल्ली, त्रिपुरा आणि तमिळनाडू आदी राज्यांनी अव्वल कामगिरी बजावली आहे. तर उत्तराखंड, गुजरात आणि हिमाचल प्रदेश यामध्ये पिछाडीवर असल्याचे ‘फाऊंडेशनल लिटरेसी न्यूमेरेसी असेसमेंट टेस्ट’च्या (एफएलएनएटी) अहवालातून समोर आले आहे.
‘एफएलएनएटी’ हे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रमाणनावर केंद्रित असलेले राष्ट्रव्यापी मूल्यांकन आहे. याद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील निरक्षर लोकसंख्येला हेरून त्यांना प्रशिक्षण देण्याबरोबरच निरक्षरतेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. यानंतर त्यांची चाचणी आणि प्रमाणित केले जाते. मूल्यांकनात वाचन, लेखन आणि अंकशास्त्र या तीन विषयांचा समावेश आहे. प्रत्येक विषयाला ५० गुण असून, एकूण १५० गुण असतात. नोंदणीकृत अशिक्षित विद्यार्थ्यांच्या मूलभूत साक्षरता आणि अंकशास्त्र कौशल्यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही चाचणी विकसित करण्यात आली आहे. ‘उल्लास’ (यूएलएलएएस) या नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत केलेल्या मूल्यांकनातून भारतीय राज्यांमध्ये प्रौढ साक्षरतेत लक्षणीय तफावत दिसून येते.
राष्ट्रीय प्रमाणन सरासरी १९.४ टक्के
● जुलै २०२४ ते मार्च २०२५ या दरम्यान टप्प्याटप्प्याने ‘एफएलएनएटी’ प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये १.७७ कोटींहून अधिक प्रौढ विद्यार्थ्यांची चाचणी झाली. यातून मे २०२५ पर्यंत फक्त ३४.३१ लाख जणांना अधिकृतपणे प्रमाणित करण्यात आले, ज्यांची राष्ट्रीय प्रमाणन सरासरी सुमारे १९.४ टक्के इतकी आहे.
● यापूर्वी, २०२३ मध्ये मार्च आणि सप्टेंबरदरम्यान, दोन चाचण्या घेण्यात आल्या होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या चाचणीत १७,३९,०९७ विद्यार्थी उपस्थित होते, त्यापैकी १५,५८,६९६ जणांना प्रमाणित करण्यात आले.
चाचणीचा आढावा
राज्य | पात्र विद्यार्थी | प्रमाणित विद्यार्थी | यशाची टक्केवारी |
तमिळनाडू | ५,०९,६९४ | ५,०९,६९४ | १०० टक्के |
त्रिपुरा | १४,१७९ | १३,९०९ | ९८.१ टक्के |
दिल्ली | ७,९५९ | ७,९०१ | ९९.३ टक्के |