पीटीआय, मदुराई
तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांनंतर त्या राज्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच (रालोआ) सरकार स्थापन होईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केला. येथे झालेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना शहा म्हणाले की मदुराई हे परिवर्तन घडवणारे शहर आहे आणि येथील कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून द्रमुकला सत्तेतून बाहेर घालवले जाईल.
तमिळनाडूमधील द्रमुक सरकार हे १०० टक्के अपयशी सरकार आहे, त्यामुळे राज्यातील जनता २०२६च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव करेल आणि भाजप-अण्णा द्रमुक आघाडी सरकार स्थापन करेल. मदुराईमध्ये राज्य, जिल्हा आणि मंडल स्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याला संबोधित करण्यापूर्वी शहा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राज्य समितीची बैठक झाली. राजकीय कार्यक्रमांपूर्वी शहा यांनी मीनाक्षी मंदिरात दर्शन घेतले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून द्रमुक सरकारवर जोरदार टीका केली. पश्चिम कोंगू भागात पोलीस वृद्धांना लक्ष्य करून ठार करत असल्याचा आरोप त्यांनी केला.