निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार होत असून मतदान यंत्रांमध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून केला जात आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर वारंवार हा मुद्दा उपस्थित करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. मात्र, मतदान यंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे फेरफार होत नसल्याचा दावा भाजपानं केला आहे. तसेच, निवडणूक आयोगानेही यासंदर्भात पुष्टी केली आहे. मात्र, आता भाजपाच्याच एका खासदारांनी केलेल्या विधानामुळे मतदान यंत्रांवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मतदान यंत्रांमध्ये बदल करण्यात आल्यामुळेच कोणत्याही पक्षाला मत दिलं तरी ते भाजपालाच जातं असा दावा विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या पार्श्वभूमीवर थेट निवडणूक आयोगाने असा कोणताही फेरफार केला जात नसून मतदान यंत्रे पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा वारंवार केला आहे. ही यंत्रे हॅक करून दाखवण्याचं आव्हानही आयोगाकडून देण्यात आलं होतं. आता भाजपाचे तेलंगणातील खासदार धर्मपुरी अरविंद यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांचं हे विधान सध्या व्हायरल होत आहे.
Opinion Poll : लोकसभा निवडणुकीत INDIA की NDA ठरणार वरचढ? भाजपाच्या जागा घटणार, पण…
काय म्हणाले धर्मपुरी अरविंद?
बुधवारी तेलंगणाच्या निजामाबाद मतदारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना धर्मपुरी अरविंद यांनी हे विधान केलं आहे. “हे पाहा, तुम्ही नोटाचं बटण दाबा, मीच जिंकेन. तुम्ही गाडीवर मत द्या, मीच जिंकेन. तुम्ही हातावर मत द्या, मीच जिंकेन. मी तुमच्या फायद्यासाठी इथे आलोय. येणार तर मोदीच”, असं धर्मपुरी अरविंद म्हणाले आहेत.
केसीआर यांच्यावर टीकास्र
दरम्यान, यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर व त्यांचा पक्ष भारत राष्ट्र समितीवरही धर्मपुरी अरविंद यांनी टीकास्र सोडलं. “सर्व राजकीय पक्ष मुस्लिमांकडे त्यांची व्होटबँक म्हणून बघतात. पण त्यांच्या विकासासाठी हे राजकीय पक्ष काम करत नाहीत. बीआरएस सरकारनंही हेच धोरण राबवलं आहे. मुस्लीम समाजाच्या विकासाची त्यांना कोणतीही पर्वा नाही. बीआरएस व एमआयएम यांच्या मैत्रीमध्ये फक्त मुस्लीम अल्पसंख्याकांना त्रास होणार आहे”, असं धर्मपुरी अरविंद यावेळी म्हणाले.