मणिपूरमधील हिंसाचार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य न केल्याने भाजपवर दबाव वाढवत विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी काँग्रेसचा हा प्रस्ताव स्वीकारला असून, सभागृह नेत्यांशी बोलून चर्चेची तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. असे असतानाही विरोधकांनी आज पुन्हा लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घातला. मणिपूर मुद्द्यावरून मोदींनी चर्चा करावी या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृह दणाणून सोडले. घोषणाबाजी आणि फलकबाजी झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

लोकसभेचे कामकाज आज सकाळी ११ वाजता सुरू झाले. पहिल्याच सत्रात झारखंडचे खासदार डॉ. निशिकांत दुबे त्यांचा प्रश्न सभागृहात मांडत होते. ते बोलायला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी सभागृहातच घोषणाबाजी करायला सुरुवात केली. मणिपूरच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सभागृहात चर्चा व्हायला हवी या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. एवढंच नव्हे तर, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यासमोरच फलकबाजी करण्यात आली. या गोंधळातही नितीन गडकरी शांततेने खासदारांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत होते. परंतु, विरोधकांचा गोंधळ सभागृहात वाढतच गेला.

हेही वाचा >> मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव ; मणिपूरप्रश्नी विरोधकांची आक्रमक भूमिका

लोकसभा अध्यक्ष संतापले

विरोधकांचा गोंधळ पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली. ते विरोधकांना म्हणाले की, “तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, ती या संसदेची परंपरा नाही. या संसदेच्या परंपरेच्या उच्च मर्यादा आहेत. तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, ते आपल्या लोकशाहीला शोभत नाही. मी पुन्हा आग्रह करतो की संसदेची संस्कृती, परंपरा राखणं आपलं कर्तव्य आहे. लोकांची भावना, अभिव्यक्ती सभागृहात मांडता यावी याकरता लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. तुम्ही घोषणाबाजी करता, पोस्टर लावता. मंत्री बोलत असताना त्यांच्यासमोरच पोस्टर धरता, ही पद्धत उचित नाही. संसदीय परंपरेच्याही हे विरोधातील आहे.”

“तुम्ही चर्चा करा, संवाद करा. प्रत्येक मुद्द्यावर बोलण्याची मी तुम्हाला संधी देईन. आपण जगातील सर्वांत मोठी लोकशाही आहोत. संपूर्ण देश तुम्हाला पाहत आहे, तुम्ही असेच वागत राहिलात तर मी अशापद्धतीने काम करू शकत नाही. या संसदेची कार्यवाही २ वाजेपर्यंत मी स्थगित करतो”, असं ओम बिर्ला म्हणाले.

राज्यसभेतही विरोधकांचा गोंधळ

राज्यसभेतही विरोधकांनी गोंधळ घातला आहे. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर राज्यसभेत परदेशी धोरणांविषयी माहिती देत असताना भाजपा खासदारांनी ‘मोदी’ ‘मोदी’चा नारा देण्यास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी ‘इंडिया’ ‘इंडिया’ची घोषणाबाजी केली. एस. जयशंकर यांनी तरीही आपल्या मुद्द्यांवर ठाम राहत माहिती देणं सुरूच ठेवलं. दरम्यान, ‘आम्हाला न्याय पाहिजे’, ‘भारताला न्याय पाहिजे’, ‘मणिपूरला न्याय पाहिजे’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली.

हेही वाचा >> मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; जमावाकडून रिकाम्या घरांची, बसची जाळपोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कपड्यांप्रमाणे विरोधकांचं मनही काळं

दरम्यान, राज्यसभेतील विरोधी पक्षातील आमदारांनी सरकारचा निषेध नोंदवण्याकरता काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. यावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांवर टीका केली. “विरोधकांचे कपडे काळे आहेत आणि त्यांचे मनही काळे आहे. त्यांच्या या काळ्या कपड्याआड त्यांचे काळे कृत्येही दडले आहेत. तसच, त्यांच्याकडे कावळेसुद्धा आकर्षित होतात. त्यांचा काल, आज आणि उद्याचा काळही काळाच असेल”, अशी संतप्त नाराजी पियुष गोयल यांनी व्यक्त केली. दरम्यान, विरोधकांचा गोंधळ वाढल्याने राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी १२ वाजेपर्यंत सभागृह स्थगित केलं. १२ वाजता सभागृह सुरू होताच पुन्हा विरोधकांची घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे सभागृह पुन्हा दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.