तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करूणानिधी आपल्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. २७ जुलै २०१८ रोजी त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये करूणानिधी यांनी ६० वर्षे योगदान दिले आहे. त्यांना द्रविडी नेता म्हणूनही ओळखले जात होते. आजतागायत निवडणुकीमध्ये त्यांना एकदाही पराभव स्विकारावा लागला नाही, करुणानिधी यांचा आमदार ते मुख्यमंत्री हा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • करूणानिधी यांचा जन्म ३ जून १९२४ रोजी तिरुकुवालाई (तामिळनाडू) येथे झाला. त्यांनी वयाच्या १४ व्या व्रषी द्रविडी आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता. १९३८मध्ये अलागिरिस्वामी यांच्या भाषणापासून प्रभावित होऊन करुणानिधी यांनी जस्टिस पार्टी जॉइन केली होती.
  • स्वातंत्र्यानंतर द्राविडार कळघम पक्षामध्ये फूट पडली. अण्णादुराई यांनी आपले राजकिय गुरू ई. वी. रामास्वामी यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी करुणानिधी यांनी त्यांचे राजकीय गुरु अण्णादुराई यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला.
  •  1949 मध्ये अण्णादुराई यांच्याबरोबर करुणानिधी यांनी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे पहिले कोषाध्यक्ष झाले.
  • १९५७ मध्ये करुणानिधी यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. द्रमुक पक्षाकडून एकूण १३ सदस्य होते. त्यामध्ये करुणानिधी यांचा समावेश होता. ते कुलीतलाईमधून मतदारसंघातून निवडणूक लढले होते.
  • १९५७ पासून करुणानिधी यांचा एकदाही पराभव झाला नाही. त्यांनी १२ वेळा विधानसेभेची निवडणूक लढवली. तसेच त्यांनी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे.
  • १९६२ मध्ये करुणानिधी यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाली.
  • १९६७ मध्ये करुणानिधी यांच्या पक्षाचा तामिळनाडूमध्ये विजय झाला आणि अण्णादुराई तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी करुणानिधी यांना कॅबिनेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाले. ते सार्वजनिक बांधकाम आणि महामार्ग खात्याचे मंत्री झाले.
  • १९६९ मध्ये करुणानिधी यांचे राजकीय गुरू अण्णादुराई यांचे निधन झाले. त्यावेळी ते द्रमुक पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • १९७१ मध्ये त्यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले. पण १९७२ मध्ये एम. जी. रामचंद्रन म्हणजे एमजीआर पक्षातून बाहेर पडले. त्यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) पक्षाची स्थापना केली.
  • १९७६ मध्ये भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली इंदिरा यांनी करुणानिधी यांचे सरकार भरखास्त केले.
  • १९७७ मध्ये अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) पक्षाने करुणानिधींच्या पक्षाचा पराभव केला. त्यानंतर १९८७ पर्यंत एमजीआर सत्तेत राहिले.
  • १९८७ मध्ये एम. जी. रामचंद्रन यांचे निधन झाल्यानंतर पुढील निवडणुकीमध्ये करुणानिधी यांचा पक्ष बहुमताने सत्तेवर आला. आणि ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले.
  • १९८९ मध्ये करुणानिधी यांच्या पक्षाला फारसे यश मिळाले नाही. पण केंद्रामध्ये व्ही.पी. सिंग यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारमध्ये त्यांनी आपले भाचे मुरासोली मारन यांना स्थान मिळवून दिले.
  • १९९९ मध्ये भाजराच्या सरकारमध्ये ते सत्तेत होते. २००४ पर्यंत ते भाजपासोबत सरकारमध्ये राहिले.
  • २००४ च्या लोकसभा निवडणूकीत करुणानीधी यांना ४० जागावर यश मिळाले होते. त्यांनी भाजपासोबतची आघाडी तोडून काँग्रेसोबत हातमिळवणी केली. यावेळी केंद्रामध्ये त्यांना सात मंत्रीपदे मिळाली होती.
  • २००६मध्ये तामिळनाडूमध्ये करुणानिधींचा पक्ष पुन्हा एकदा सत्तेत आला आणि पाचव्यांदा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये करुणानिधींच्या पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
  • २०१६ मध्ये तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष विजयी झाला. सध्या त्यांचा पक्ष तामिळनाडू विधानसभेत सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे.
  • २०१७ मध्ये तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे स्टॅलीन यांनी पक्षाच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The political journey of m karunanidhi
First published on: 07-08-2018 at 19:56 IST