पीटीआय, मोडासा (गुजरात) : गुजरातमध्ये मोफत वीजपुरवठा करण्यापेक्षा विजेपासून उत्पन्न मिळवण्याची ही वेळ आहे. विजेपासून उत्पन्न मिळाल्यास त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मोडासा येथे केले. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधानांची जाहीर सभा येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत पंतप्रधानांनी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास मोफत वीज देऊ असे आश्वासन दिले होते. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे त्यांचा पक्ष दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले होते. त्याशिवाय काँग्रेसनेही त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे की ते सत्तेवर आल्यास ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देणार आहेत. मात्र आता विजेपासून उत्पन्न मिळवण्याची वेळ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. केजरीवाल हे देशातील एकमेव राजकारणी आहेत, ज्यांनी मोफत वीज देण्याच्या या जादूमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. काँग्रेसही यामध्ये सामील झाला असून त्यांना यात यश मिळणार नसल्याचे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेस केवळ ‘फोडा आणि राज्य करा’ या सूत्रावर विश्वास ठेवते आणि सत्तेत कसे राहायचे यावर लक्ष केंद्रित करते. मात्र संपूर्ण गुजरातमधील जनतेला सोलर रूफटॉप सिस्टीममधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज मोफत मिळण्याऐवजी त्यातून पैसे मिळवायचे आहेत. ‘‘तुम्ही बघितलेच असेल की संपूर्ण मोढेरा गाव (मेहसाणा जिल्हा) आता छतावरील सौरऊर्जेवर कसे चालत आहे. ते त्यांच्या गरजेनुसार वीज वापरत आहेत आणि अतिरिक्त वीज सरकारला विकतात. मला ही प्रणाली संपूर्ण गुजरातमध्ये लागू करायची आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाले. ‘‘या प्रणालीअंतर्गत तुम्ही सौर पॅनेलमधून निर्माण होणारी अतिरिक्त वीज विकून पैसे कमवू शकता. ही कला फक्त मोदींनाच माहीत आहे, ज्याद्वारे लोक विजेपासून कमाई करू शकतात,’’ असे पंतप्रधान म्हणाले. छतावर सौरऊर्जा बसवल्यानंतर वीज परवडणारी झाल्याने मोढेरा येथील एका महिलेने रेफ्रिजरेटर आणि वातानुकूलित यंत्र विकत घेण्याचा विचार केला आहे. पूर्वी कुटुंबाला ही उपकरणे घेणे परवडत नव्हते, मात्र आता सौरऊर्जेपासून वीज मोफत मिळत असल्याने त्यांना ते परवडत आहे. ही क्रांती प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्यासाठी मी काम करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत अरवली जिल्ह्यातील शेतकरी शेतीसाठी परवडणाऱ्या विजेच्या मागणीसाठी पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मात्र आता याच जिल्ह्यातील शेतकरी सौर पॅनलद्वारे वीज निर्माण करत आहेत. ते जास्तीची वीज विकून पैसेही कमवू शकतात. परवडणाऱ्या विजेची मागणी करण्याचे युग संपले आहे. आज तुम्ही वीज विकून उत्पन्न मिळवू शकता, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.