पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी सिव्हिल सोसायटी सदस्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्यासहित शत्रुघ्न सिन्हा, महेश भट, मेधा पाटकर, तुषार गांधी असे कला, सामाजिक तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी यावेळी सर्वांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. दरम्यान यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावरुन भाजपावर जोरदार टीका केला.

“उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला देऊन शिवसेनेला महाराष्ट्रातील तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?”

शाहरुख खानचा राजकीय बळी देण्यात आला अशी टीका करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपाला क्रूर आणि अलोकतांत्रिक पक्ष असल्याचं म्हटलं. “महेशजी (चित्रपट दिग्दर्शक महेश भट) तुम्हाला लक्ष्य करण्यात आलं होतं, शाहरुख खानलाही त्रास देण्यात आला. जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला लढलं आणि बोललं पाहिजे. तुम्ही आम्हाला राजकीय पक्ष म्हणून मार्गदर्शन करा आणि सल्ला द्या,” असं ममता बॅनर्जींनी यावेळी म्हटलं.

“…तर भाजपाचा पराभव करणं सोपं”, ममता बॅनर्जींनी मुंबईत दिले भाजपाविरोधी आघाडीचे संकेत!

पुढे त्यांनी म्हटलं की, “भारताला मॅनपावर (manpower) आवडते मसल पावर (muscle power) नाही. आपण अलोकतांत्रिक पक्षाचा सामना करत आहोत. जर आपण सोबत असू तर नक्कीच जिंकू”. “सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपाचा पराभव करणं सहज होईल,” असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

दरम्यान संवाद साधताना ममता बॅनर्जी यांनी मराठीत सुरुवात करत महाराष्ट्रातील जनतेला माझं विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा असं म्हटलं. यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं.

यावेळी त्यांनी रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून संस्कृतीचंही केंद्र आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पूल असल्याचं सांगत महाराष्ट्र आणि बंगालंच नात चांगलं आहे असंही त्यांनी सांगितलं. फक्त भाषण देण्यापेक्षा मला ऐकायला जास्त आवडतं असं सांगताना ममता बॅनर्जी यांनी यावेळी पश्चिम बंगाल सरकराच्या योजना आणि कामांचीही माहिती दिली.