काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरला पत्र लिहिलं असून आपले फॉलोअर्स वाढत नसल्याचा आरोप केला आहे. फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव असल्याचंही ते म्हणाले आहेत. ट्विटर भारत सरकारच्या दबावाखाली नवीन फॉलोअर्स न वाढू देता. ते मर्यादित करण्याचा प्रयत्न करत आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांवर ट्विटरने प्रतिक्रिया देत उत्तर दिलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांनी पत्र लिहिलं आहे. ट्विटरने यावर प्रतिक्रिया देताना ही संख्या अर्थपूर्ण आणि अचूक असल्याचं सांगितलं आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने फॉलोअर्सची संख्या हे समोर दिसणारं एक फिचर असून प्लॅटफॉर्मची हाताळणी आणि गडबड यासाठी चुकीला कोणतीही जागा नसल्याचं सांगितलं आहे.
“आम्ही कोणत्याही प्रकारचा घोटाळा तसंच छेडछाड होऊ नये यासाठी धोरणात्मकपणे आणि मशीन लर्निंग टूल्सच्या सहाय्याने लढा देतो. चांगली सेवा आणि विश्वासार्ह खाती सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात,” असंही ट्विटर प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.
माझे फॉलोअर्स वाढू नयेत म्हणून मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव; राहुल गांधींचा आरोप
राहुल गांधी यांनी २७ डिसेंबर रोजी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले असून ते मोदी सरकारच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप केला. राहुल गांधी यांनी ट्विटरला काही तपशीलवार माहिती पाठवली आहे. त्यातून त्यांनी निदर्शनास आणून दिले की पूर्वी दरमहा सरासरी २.३ लाखांहून अधिक नवीन फॉलोअर्स वाढत होते. काही महिन्यांमध्ये तो आकडा वाढून ६.५ लाखांपर्यंत गेला होता. परंतु ऑगस्ट २०२१ पासून, म्हणजेच अकाउंट अनलॉक झाल्यापासून त्यांचे महिन्याला केवळ २५०० फॉलोअर्स वाढत आहेत. ऑगस्ट महिन्यापासून ते आतापर्यंत आपले १ कोटी ९५ लाख फॉलोअर्स गोठवण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
राहुल गांधी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे छायाचित्र ट्विट केल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट वादात सापडले होते. पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट करून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला. नंतर, कायद्याचं उल्लंघन झाल्याचं म्हणत राहुल गांधींचं अकाउंट एका आठवड्यासाठी लॉक करण्यात आलं होतं.
राहुल गांधी यांनी पराग अग्रवाल यांना लिहिले, “ट्विटर भारतातील हुकूमशाहीच्या वाढीस सक्रियपणे मदत करत नाही, याची खात्री करण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे”.
“जगभरातील उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील वैचारिक लढाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदयास येत आहे. यामुळे ट्विटर सारख्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येते,” असं ते म्हणाले.
ट्विटरच्या प्रवक्त्यांनी प्रत्येक आठवड्याला नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लाखो खात्यांवर कारवाई केली जाते असं सांगितलं आहे. काही ट्विटरला हँडल्सना फॉलोअर्सची संख्या कमी झालेली दिसत असताना काही अकाऊंट्समध्ये ही मोठ्या प्रमाणात वाडलेली असू शकते असं ते म्हणाले आहेत.